औरंगाबाद : विविध कारणांमुळे यकृत खराब झाल्यावर यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो; परंतु दात्याअभावी प्रत्यारोपण शक्य होत नाही. अशा परिस्थितीवर रिजेनेटिव्ह थेरपीद्वारे काही प्रमाणात मात करून यकृतास पुनरुज्जीवित करता येत आहे. थेरपीद्वारे ५ टक्क्यांपर्यंत यकृत पुनरुज्जीवित होत असल्याने रुग्णाचे जीवन सुसह्य होते; परंतु तरीही ही थेरपी प्रत्यारोपणाची जागा घेऊ शकत नाही, असे दिल्ली येथील इन्स्टिट्यूट आॅफ लिव्हर अॅण्ड बिलिअरी सायन्सेसचे संचालक पद्मभूषण डॉ. शिव सरीन म्हणाले.‘मराठवाडा सोसायटी आॅफ गॅस्ट्रोएंटरॉलॉजी’तर्फे पचनविकार व यकृतविकारतज्ज्ञांच्या आयोजित राज्यस्तरीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी आयोजित सत्रात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. सतीश कुलकर्णी, डॉ. रमेश सातारकर, डॉ. अनिरुद्ध गोपनपल्लीकर, डॉ. संदीप काळोखे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. शिव सरीन म्हणाले की, नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशा बोन मॉरो व यकृत अशा दोन बाजू आहेत. यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय नसल्यावर बोन मॅरोच्या मदतीने रिजेनेटिव्ह थेरपीद्वारे यकृत पुनरुज्जीवित केले जाते. देशभरात दरवर्षी २ लाख यकृताच्या प्रत्यारोपणाची आवश्यकता असते; परंतु प्रत्यक्षात अवघ्या २ हजार यकृतांचे प्रत्यारोपण होत आहे. प्रत्यारोपणाअभावी अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते.
यकृत पुनरुज्जीवित करणे लाभदायक
By admin | Updated: December 28, 2015 00:27 IST