औरंगाबाद : गांधी-नेहरू घराण्यावर सातत्याने टीका करून हिणवण्याचे एक षडयंत्र रचण्यात आलेले आहे. राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांना मोकाट सुटलेला वळू व सांड म्हणणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve) यांना आम्हीही म्हसोबाचा बोकड्या म्हणू शकतो, पण म्हणणार नाही. कारण ती आमची संस्कृती नाही, असा टोला प्रदेश कॉंग्रेस ( Congress ) सेवादलाचे अध्यक्ष विलासबापू औताडे यांनी शनिवारी तातडीने घेतलेल्या पत्रपरिषदेत हाणला. ( Raosaheb Danve can be called Mhasoba's goat, but we won't call )
त्यांनी सांगितले की, रावसाहेब दानवे एवढे काळे आहेत की, त्यांना काळे फासलेलेही दिसणार नाही. म्हणून मी स्वतः कार्यकर्त्यांसह त्यांना पांढरे फासणार आहे. कन्नडच्या सभेत आमचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही तर दोनचार दिवसांत कधीही आणि कुठेही त्यांना पांढरे फासल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आरोप केला की, रावसाहेब दानवेंसारखी माणसे सातत्याने हीन दर्जाची टीका करताहेत, हे सुनियोजित वाटते. कारण यामागे नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मूकसंमती दिसते.मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावं हा यामागे हेतू दिसतो. महागाई, बेकारी, महिलांवरील अन्याय हे विषय महत्त्वाचे, पण त्याबद्द्ल हे भाजपवाले काही बोलत नाहीत, अशी खंत औताडे यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा - राहुल गांधी म्हणजे ‘देवाला सोडलेला वळू’; रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली
तसेच औताडे यांनी इशारा दिला की, इथून पुढे दानवेंना त्यांच्या पक्षाने न आवरल्यास त्यांच्या तोंडाला आम्ही पांढरं लावणार व पुतळे जाळणार आहोत. स्वातंत्र्य लढ्यात कोणताच सहभाग नसलेल्या या मंडळींचा सत्ता हाच यांचा अजेंडा आहे. कोरोनाची पर्वा न करता हे निवडणूक प्रचार करीत राहिले, हे साऱ्या देशाने पाहिले अशी टीका त्यांनी केली. या पत्रपरिषदेस अनिल मानकापे, सुरेश पवार, अल्ताफ पटेल, नीलेश पवार, गणेश घोरपडे, सुमेध निमगावकर, प्रदीप शिंदे, विजय पुंगळे, सुभाष हिवराळे, शकिल शहा, अर्जुन ठ़ोंबरे, मुदस्सर अन्सारी आदींची उपस्थिती होती.