सिल्लोड: ‘ब्रेक द चेन’ च्या नावाखाली २५ दिवस दुकाने बंद ठेवणे हे कुणालाही परवडणारे नाही. कारण, या बंदच्या काळात वीजबिल, दुकान भाडे, बँकेच्या कर्जावरील व्याज, कामगारांचा पगार, कर भरणा सुरूच राहणार आहे, त्यात दुकाने बंद म्हणजे 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' असेच आहे. म्हणून, लवकरात लवकर नियम शिथिल करून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, नसता सिल्लोड तालुक्यातील सर्व व्यापारी मुलांबाळांसहित रस्त्यावर उतरतील, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी दिला.
शुक्रवारी दुपारी सिल्लोड शहरातील व्यापारी व विविध पक्षाचे पदाधिकारी रस्त्यावर उतरत शासनाच्या धोरणाविरोधात निषेध व्यक्त केला. तर एक तास तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांना दिले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारीया, कोषाध्यक्ष प्रकाश भोजवानी, भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष प्रशांत चिनके, युवा मोर्चाचे सुनील मिरकर, कम्युनिस्ट पक्षाचे सय्यद अनिस, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख फेरोज, एमआयएमचे शेख बबलू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शेख अमान, इरफान पठाण, भाजपचे मधुकर राऊत या विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
फोटो : व्यापारी व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.