औरंगाबाद : नाशिक कुंभमेळ्याच्या धर्तीवर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव २०२३ मध्ये साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी शहर विकासाचा प्रकल्प आराखडा तयार करावा अशी सूचना अलीकडेच पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिकेला केली. त्यानुसार प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी बैठकांचे सत्र सुरू केले. शहरातील उद्योजकांसोबत सोमवारी सायंकाळी प्राथमिक चर्चा करण्यात आली.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव १७ सप्टेंबर २०२३ रोजी साजरा होणार आहे. त्यामुळे १७ सप्टेंबर २०२२ ते १७ सप्टेंबर २०२३ हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्याची कल्पना पालकमंत्री यांनी मांडली. नाशिक येथे कुंभमेळ्याच्या निमित्ताने जसे उपक्रम राबविण्यात येतात, त्याच पद्धतीने शहरात उपक्रम राबवावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. महापालिकेचे प्रशासक पाण्डेय यांनी सर्वप्रथम उद्योजक ऋषी बागला, राम भोगले, रमण आजगावकर, नारायण पवार, अनिल इरावणे आदी उद्योजकांसोबत चर्चा केली. शहराच्या संदर्भात मनपा स्तरावर तर जिल्हा आणि विभागीय स्तरावर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त स्तरावर बैठका घेतल्या जाऊन नियोजन केले जाणार आहे.
पर्यटन प्राधिकरण करा
ऋषी बागला यांनी शहरात पार्किंग व्यवस्था, हॉकर्स झोन, रिक्षांना जागा या मूलभूत गोष्टींकडे लक्ष वेधले. राम भोगले म्हणाले, १९७० च्या दशकात शहरामध्ये केवळ शैक्षणिक सुविधा, शासकीय कार्यालये होती. आता शैक्षणिक सुविधेसह उद्योग, पर्यटन, दळणवळण या क्षेत्रात देखील शहराने भरारी घेतली आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रांसाठी काय करता येईल, याचा गांभीर्याने विचार करावा. पर्यटनासाठी स्वतंत्र प्राधिकरण तयार करण्याचा विचार केला जावा, असे मत मांडले.