छत्रपती संभाजीनगर:मराठा आरक्षण मागणीसह आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाशी संबंधित विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या बाराहून अधिक संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांच्यावतीने २२ फेब्रुवारीपासून क्रांतीचौक येथे मराठा आरक्षण चिंतन आंदोलन छेडण्याचा इशारा सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आला.मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि विविध छावा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
संघटनांच्यावतीने रवींद्र काळे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करीत आहेत. अद्याप मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना झाली नाही. या समितीचे अध्यक्ष कोण असेल, हे अद्याप जाहिर केले नाही. राजेंद्र दाते पाटील म्हणाले की, राज्यसरकारच्या हातात असूनही अनेक मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाही. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा असूनही ईडब्ल्यू एस चे १० टक्के आरक्षण देण्याचा अट्टहास करण्यात आला. कायद्यानुसार राज्यसरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. मात्र सरकारने दिलेले १० टक्के एसईबीसीचे आरक्षण आम्हाला मान्य नाही. मराठा समाजाला घटनेमध्ये टिकणारे आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. हे आरक्षण कसे देणे शक्य आहे,याविषयीचे सादरीकरण आंदेालनस्थळी करण्यात येणार असल्याचे दाते पाटील यांनी नमूद केले.
रमेश केरे पाटील म्हणाले की, क्रांतीचौकात २२ फेब्रुवारी रोजी मराठा समाजाच्या सर्व संघटना एकत्रित आंदोलन करणार आहेत. माझ्यासह अनेक जण २२ रोजी उपोषणाला बसतील. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
शहरातील दोन मंत्र्यांची भेट घेतलीजिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांची आम्ही भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासंदर्भात राज्यसरकारचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यासोबत बैठक आयोजित करा आणि प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी केली. सरकारने २२ फेब्रुवारीपर्यंत निर्णय न घेतल्यास आम्ही उपोषण करणार असल्याचे केरे पाटील यांनी सांगितले.