औरंगाबाद : पहिल्या तीन मुली असल्याची माहिती लपवून दुसऱ्यांदा संसार थाटला. मात्र, त्यानंतर तिचा हुंड्यासाठी पतीसह सासरच्यांनी छळ सुरू केला. हा प्रकार ८ जुलै २०२१ पासून सुरू होता. अखेर विवाहितेने छळाला कंटाळून छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदवला आहे.
पती संदीप मनवर, सासरा माणिक मनवर, सासू, नणंद (सर्व रा. भावसिंगपुरा) आणि मामे सासरा अनिल सोनवणे (रा. मनोरा, ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार; पती संदीप मनवर याने तिचा पैशांसाठी मानसिक व शारीरिक छळ केला; तसेच मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविले.
लग्नाच्या वेळी त्याने त्याला असलेल्या तीन मुलींची माहिती लपवून ठेवली. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला, तर मामे सासरा अनिल सोनवणे याने, ‘माझी पत्नी जळून मेली. त्यावेळी मला कोणी काही केले नाही. तुला काय करायचे ते कर. माझं पोलिस आणि कोर्ट काहीच करू शकत नाही,’ अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पांडुरंग डाके करीत आहेत.