बापू सोळुंके, औरंगाबादसार्वजनिक आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत राज्यात २६ जानेवारीपासून मोफत अॅम्ब्युलन्स सेवेला प्रारंभ केला. तेव्हापासून १५ आॅगस्टपर्यंत ८ हजार ५११ कॉल नियंत्रण कक्षाला आले. यापैकी ४ हजार ३६ रुग्णांना अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. यात हृदयविकाराचा झटका आलेल्या ४६ रुग्णांचा, तर अपघातामधील ७५८ जणांचा समावेश आहे.औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३० अॅम्ब्युलन्स, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे २० आणि १० अॅम्ब्युलन्सची त्यात भर पडली. जिल्ह्यात प्रत्येक ३० किलोमीटर अंतरावर या अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आलेल्या आहेत. अॅडव्हान्स लाईफ सेव्हिंग सपोर्ट (एएलएस) आणि बेसिक लाईफ सेव्हिंग सपोर्ट, अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या या अॅम्ब्युलन्स आहेत. एएलएस अॅम्ब्युलन्समध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णास तातडीचे उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यात व्हेंटिलेटर सिस्टिम, ईसीजी मशीन आणि इतर महत्त्वाची जीवनदायी औषधी उपलब्ध असतात. अशा १० एएलएस अॅम्ब्युलन्स औरंगाबाद जिल्ह्यात आहेत, तर उर्वरित अॅम्ब्युलन्स या घात, अपघातामधील जखमी, प्रसूती वेदना होत असलेल्या स्त्रिया, जळालेले, विषबाधा, सर्पदंशाचे रुग्ण यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी काम करीत आहेत. आरोग्य उपसंचालक डॉ. आर.टी. चव्हाण यांनी सांगितले की, औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत ही सेवा दिली जाते.
प्राणरक्षक जीवनदायिनी
By admin | Updated: August 25, 2014 00:26 IST