सुनील घोडके, खुलताबाद गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे मध्यम प्रकल्प, पाझर तलाव तुडुंब भरल्याने यंदा उन्हाळ्यात आतापर्यंत खुलताबाद तालुक्यातील कोणत्याही गावात टँकर सुरू झालेले नाही, त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात खुलताबाद तालुका टँकरमुक्त तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पात मुबलक पाणी असतानाही खुलताबादकरांना तीन दिवसाआड अत्यल्प पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खुलताबाद तालुक्यात या वर्षीच्या उन्हाळ्यात तालुक्यातील ७६ पैकी एकाही गावातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, असा एकही प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात आजपर्यंत आला नाही. खुलताबाद तालुक्यात आजही मध्यम प्रकल्पात बर्यापैकी पाणीसाठा आहे. विहिरीची पाणीपातळीही चांगली असल्याने कुठेही पाणीटंचाईची ओरड झाली नसल्याने तहसील व पंचायत समिती प्रशासन पाणीटंचाईच्या डोकेदुखीपासून दूर आहे. येत्या काही दिवसांतही पाण्याचे टँकर सुरू होण्याची शक्यता नाही. येसगाव गिरिजा मध्यम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असून या प्रकल्पातून शेतीसाठी पाण्याची चोरी होत आहे. त्यामुळे खुलताबादकरांना किमान पाणी एक दिवसाआड करण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिक व महिलांनी केली आहे. (वार्ताहर) कृत्रिम पाणीटंचाई खुलताबाद नगर परिषदेच्या उदासीन धोरणामुळे गिरिजा मध्यम प्रकल्पात पाणी असतानाही खुलताबादकरांना वर्षभरापासून तीन दिवसाआड अत्यल्प पाणीपुरवठा करण्यात येत असून त्यातही पाणी सोडण्याची निश्चित वेळ नसल्याने कधीही पाणीपुरवठा करण्यात येतो. साळीवाडा, धोबीवाडा, इमामबाडा, खुटाबाहुली, जुनी स्टेट बँक रोड परिसरात रात्री आठ वाजता अत्यल्प पाणी सोडण्यात आले, तर काळी भागात सकाळी सहा वाजता पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नगर परिषदेने कोणत्याही एकाचवेळी पाणी सोडावे, अशी महिला वर्गाची मागणी आहे.
खुलताबाद तालुका टँकरमुक्त !
By admin | Updated: May 30, 2014 01:01 IST