केवळ मलमपट्टी!

By Admin | Updated: September 4, 2014 01:26 IST2014-09-04T00:44:35+5:302014-09-04T01:26:47+5:30

सोमनाथ खताळ , बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यास बुधवारी सुरूवात केली मात्र खड्ड्यांमध्ये मोठ मोठे दगड असलेला

Just dressing up! | केवळ मलमपट्टी!

केवळ मलमपट्टी!


सोमनाथ खताळ , बीड
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यास बुधवारी सुरूवात केली मात्र खड्ड्यांमध्ये मोठ मोठे दगड असलेला मुरूम टाकून केवळ मलमपट्टी करण्याचे काम संबंधित विभाग करीत होता. या मलमपट्टीमुळे अपघात रोखण्याऐवजी वाढण्याचीच अधिक भीती वर्तविली जात आहे. खड्डे बुजविण्यास सुरूवात झाली असली तरी अपघाताची मालिका मात्र काही केल्या थांबत नव्हती.
अनेक दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाने मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी बरसायला सुरूवात केली आहे. या पावसामुळे बळीराजा खूश झाला आहे. याच पावसाने महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम जनतेसमोर आले आहे. जालना रोडहून बार्शीनाका हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल अर्ध्या तासाचा अवधी लागतो. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक खूप मोठी असून त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
अगोदरच बीड शहराला बायपास आणि उड्डाणपूल नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यातच आणखी भर म्हणून महामार्गावर खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांंमुळे सध्या छोटे-मोठे अपघात मोठया प्रमाणात घडत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून दुचाकी घसरणे, चारचाकी वाहन खड्ड्यांंमध्ये आदळून पार्ट तुटणे, अवजड वाहने पुढे चालत असताना मागील वाहन खड्ड्यांत आदळून अपघात होणे, यासारखे अनेक छोटेमोठे अपघात घडत आहेत.
मंगळवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली होती. त्यानंतर बुधवारी महामार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरूवात करण्यात आली होती. मात्र हे खड्डे मोठ मोठे दगड असलेला मुरूम टाकून बुजविले जात होते. त्यामुळे जी अपघाताची मालिका सुरू होती, ती काही केल्या बंद झाली नव्हती.
संघटना, पुढारी झोपले!
एवढे जीवघेणे खड्डे महामार्गावर पडले असताना कोणतीही सामाजिक संघटना, पुढारी यावर आवाज उठविण्यास तयार नाहीत. एरव्ही प्रसिद्धीसाठी पुढे पुढे करणारे सामाजिक कार्यकर्ते, पुढारी गेले कुठे? असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.
नगर रोडवर टाकली बारीक खडी
बुधवारी नगर रोडवरीलही खड्डे बुजविण्यास सुरूवात केली होती. या खड्ड्यांमध्ये टाकण्यात येणारा मुरूमही खराब होता. तसेच मुरूम टाकल्यानंतर पाणी टाकून १० एमएमची बारीक खडी त्यावर टाकण्यात येत होती. मात्र बुजविलेले खड्डे किती दिवस टिकतील? हे सांगणे कठीणआहे. मोठा पाऊस आला तर लवकरच हे खड्डे उखडतील आणि नाही आला तर किमान दोन महिने हे खड्डे टिकू शकतात, असे सा.बां.चे उपविभागीय अधिकारी एस.सी.दंडे यांनी सांगितले.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, अरूंद रस्ता, अतिक्रमण, बायपास व उड्डाणपुल नसणे आदींमुळे विद्यार्थ्यांपासून ते पोलिसांपर्यंत बळी गेलेले आहेत.
४अपघात झाल्यानंतरच संघटना, पुढारी यांना जाग येते आणि मोर्चे, आंदोलने करतात.
४काही कालावधीनंतर हेच लोक अपघात विसरून जातात आणि जैसे थे परिस्थिती पुन्हा पहावयास मिळते.
४त्यानंतर पुन्हा अपघात झाल्यावर याच संघटना व पुढारी पहिल्यासारखेच करतात.
४प्रशासन ढिम्म तर संघटना थंड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़
४त्यामुळे सामान्यांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे़

Web Title: Just dressing up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.