नळेगाव : गावातील विविध समस्या सोडविण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरत असल्याचा आरोप करीत सोमवारी शिवसेनेच्या वतीने ‘बोंबा ठोको’ आंदोलन करीत ग्रामपंचायतीस टाळे ठोकण्यात आले. नळेगावात विविध नागरी समस्या आहेत. या समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने यापूर्वी निवेदनाद्वारे करण्यात आली. तेव्हा ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील समस्या सोडवून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र सव्वा महिना उलटूनही त्याची पूर्तता करण्यात आली नाही. परिणामी, सोमवारी सकाळी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावातून ‘बोंबा ठोको’ आंदोलन करण्यास सुरुवात करून ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. यावेळी दत्ता बिराजदार, रवि शिरूरे, दिगांबर बिराजदार, सुरेश देवशटवार, दत्ता दाडगे, दिगांबर तांदळे, बालाजी सुवर्णकार, शंकर शेलार, युवराज पाटील, अमीर मुजावर, राहुल हेरकर, शाम जाधव आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)४दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य रामराव बुदरे, कांतराव चव्हाण यांनी शिवसेना कार्यकर्ते व ग्रामसेवक अमित रोकडे यांना एकत्रित आणून मध्यस्थीने हा प्रश्न सोडविला. त्यामुळे पुन्हा कामकाजास सुरुवात झाली.
ग्रामपंचायतीला ठोकले टाळे
By admin | Updated: December 23, 2014 00:07 IST