पुन्हा मुलींचीच बाजी!
By Admin | Updated: June 14, 2017 02:20 IST2017-06-14T02:20:50+5:302017-06-14T02:20:50+5:30
जिल्ह्याचा एकूण निकाल ८४% : जिल्ह्यात पातूर तालुका अव्वल

पुन्हा मुलींचीच बाजी!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मोठ्या प्रतीक्षेनंतर १३ जून रोजी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अकोला जिल्ह्याचा निकाल ८४.०२ टक्के लागला आहे. टक्केवारीत बारावीच्या निकाला पाठोपाठ दहावीतही मुलींनीच आघाडी घेतली आहे. ८६.५ टक्के प्राप्त करू न पातूर तालुका निकालात जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. अकोल्याच्या हिंदू ज्ञानपीठची विद्यार्थीनी गायत्री सरोदे हिने ९९.६० टक्के गुण घेऊन अव्वल स्थान पटकाविले आहे तर बाल शिवाजी कॉन्व्हेंटच्या सुरभी देशपांडे व आरोही खोडकुंभे या दोघींनी ९९.२० टक्के गुण मिळविले आहेत. विशेष म्हणजे या तिघींच्या गुणांच्या टक्केवारीमध्ये क्रीडा गुणांचा समावेश नसल्याने त्यांचे यश नेत्रदिपक ठरले आहे. जिल्ह्यातील २८,४१३ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षा दिली होती. त्यापैकी २३,८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ११,९९६ मुले तर ११,८७८ मुलींचा समावेश आहे. निकाल जाहीर होताच शहरातील विविध शाळांमधील विद्यर्थ्यांनी जल्लोष केला. भारत विद्यालय, विवेकानंद शाळा व बाल शिवाजी हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला.जिल्ह्यात यावर्षी पातूर तालुक्याने बाजी मारली असून, तालुक्याचा निकाल ८२.८३ असा लागला आहे. अकोला तालुका दुसऱ्या क्रमांकावर असून, या तालुक्याचा निकाल हा ८५.०७ टक्के एवढा आहे. बाळापूर निकाल ८४.९९ टक्के, बार्शीटाकळी ८४.९३ टक्के, अकोट ८१.३५ तर तेल्हारा तालुक्याचा निकाल ८०.५१ टक्के एवढा लागला आहे.
४,५३९ विद्यार्थी अनुत्तीर्ण
जिल्ह्यात एकूण नोंदणीपैकी प्रत्यक्षात २८,४१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २३,८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच ४,५३९ विद्यार्थी यावर्षी अनुतीर्ण झाले आहेत. ही टक्केवारी १५.९८ एवढी आहे.