छत्रपती संभाजीनगर : माळीवाडा परिसरातील रेल्वेच्या कंटेंनर डेपोला आग लागली. यात तीन कंटेनरसह एक मोठी क्रेन जळाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. डेपोमधील इंधनामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, या घटनेत कोणालाही इजा झाली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.
माळीवाड्याच्या रेल्वेस्थानकाच्या कंटेनर डेपोला आग लागल्याचा कॉल बुधवारी रात्री ८:३० वाजता पदमपुरा अग्निशमन केंद्राला आला. उपअग्निशमन केंद्राधिकारी अशोक खांडेकर, संजय कुलकर्णी हे पथकासह रवाना झाले. दोन बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत एक क्रेनसह तीन कंटेंनरने पेट घेऊन मोठे नुकसान झाले.
लपवाछपवी कशासाठी?आग मोठी असतानाही ती बाहेर कोणाला कळू नये म्हणून टर्मिनल मॅनेजरने प्रयत्न केले. परंतु आग वाढतच गेल्याने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. ही आग नेमकी कशामुळे लागली, याबद्दल कंटेनर विभागाचे अधिकारी, कर्मचारी मूग गिळून आहेत. माध्यमांना सुद्धा परिसरात प्रवेश करण्यासाठी थांबवण्यात आले आहे. येथील यंत्रसामुग्री जुनाट बनली आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती येथे असून सुद्धा जुन्या मशीन का वापरल्या जातात, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. या आगीमुळे नेमके किती रुपयांचे नुकसान झाले आहे, याचाही तपशील जाहीर केला गेला नाही. या डेपोमध्ये रेल्वेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील माल येथे येतो. या कामाचा ठेका हरयाणा येथील प्रेमचंद अँड कंपनीकडे असल्याचे समजते. अग्निशमन दलाचे सूरज राठोड, शिवसांब कल्याणकर, अमिताभ कराड, दीपक गाडेकर, विक्रांत बकले, अजिनाथ खिल्लारे आदींनी आग आटोक्यात आणली.