औरंगाबाद - राज्यात विधानसभा अधिवेशनापूर्वीपासूनच विरोधक हात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीली पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधक आक्रमक झाले होते. त्यानंतर, सचिन वाझे अन् मनसुख हिरेन प्रकरणावरुन राज्य सरकार कोडींत सापडले असताना माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवून राजकीय भूकंप घडवला. त्यामुळे, विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचे संकटही चांगलच वाढलय. यावरुनच, भाजपा आमदार श्वेता महाले पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावलाय.
महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र, विरोधकांकडून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरुच आहे. भाजपा नेत्यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. राज्यातील काही नेत्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी केलीय. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. आता, भाजपा नेत्या आणि चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे अमूल्य जीव वाचतील, असे महाले यांनी म्हटलंय. दरम्यान, महाले यांनी औरंगाबाद घाटी रुग्णालयातील काही फोटोही शेअर केले आहेत.
दरम्यान, एकीकडे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना दुसरीकडे कोरोनानेही डोकं वर काढलंय. कोरोनाची सर्वाधिक वाढ असलेल्या देशातील 10 जिल्ह्यांपैकी 9 जिल्हे महाराष्ट्रातील असल्याचे केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे, कोरोना आणि दुसरीकडे विरोधकांची आक्रमक भूमिका या दोन्हींना तोंड द्यायचं काम सरकारला करावे लागत आहे.