जालना : पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे जालना बसस्थानकात गुरूवारी दिसून आले. जालना विभागाने प्रवाशांसाठी विशेष बसेसची व्यवस्था केली आहे. लाडक्या विठूरायाचे आषाढी एकदाशीला दर्शन व्हवे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी एसटी महामंडळाने विभागातून ७६ बसेसची व्यवस्था केली आहे. जालना, परतूर, अंबड व जाफराबाद आगारातून प्रत्येकी प्रवाशांची गर्दी पाहता २० ते २५ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतीची कामेही पूर्ण झाली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या वाढल्याचे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दिवसाकाठी चार आगार मिळून ३ हजारांपेक्षा जास्त भाविक एक फेरीतून पंढरपूरकडे रवाना होत आहे. प्रत्येक आगाराच्या शेकडो फेऱ्या होत आहेत. एकूणच एक ते दीड लाख भाविक जिल्ह्यातून दर्शनासाठी जातील, असा अंदाज व्यक्त होत आहे. याविषयी जालना आगारप्रमुख एस. जी. मेहेत्रे म्हणाले की, पंढरपूर येथे जाण्यासाठी भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी शेडची व्यवस्था, माहिती कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शुक्रवारी दिवसरात्र एसटी महामंडळाच्या बसेस सज्ज असून, भाविकांनी एसटी महामंडळाच्या गाड्यांतून प्रवास करावा, असे आवाहन केले.
आषाढीनिमित्त भाविकांची गर्दी
By admin | Updated: July 15, 2016 00:45 IST