बीड : ढगाळ वातावरण आणि वाऱ्याला सुरूवात होताच शहरातील वीज गायब होणार याची धास्ती नागरिकांना कायम आहे. सध्या बीड विभाग भारनियमनमुक्त असतानाही दिवसकाठी ४ ते ५ तास वीज गायब असल्याने नागरिक त्रस्त आहेत. धानोरा रोडवरील उपकेंद्रातील स्प्रिंग चार्ज नसल्याने वीजपुरवठा खंडित करावा लागला होता. त्यामुळे बीडकरांना सबंध रात्र जागून काढावी लागली होती. ग्रामीण भागाबरोबरच शहरातीलही महावितरणची दुरूस्तीची कामे रखडलेली आहेत. त्यामुळेच वाऱ्याला आणि पावसाला सुरूवात होताच वीज गायब होणार हा अलिखित नियम झाला आहे. असे असतनाही विभागाकडून दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. कंत्राटदारांची बिले रखडल्याने दुरूस्ती कामे देणेही अवघड झाले आहे. त्यामुळे लहान-मोठ्या अडचणीमुळे शहरातील वीजपुरवठा तासन्तास खंडित करण्याची नामुष्की येत आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात व परिसरात अवकाळी पाऊस होत आहे. वाऱ्यामुळे जागोजागी विद्युत तारांवर झाडाच्या फांद्या पडत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. वर्षभरापासून निधीअभावी महावितरणची दुरूस्तीची कामे रखडलेली आहेत. गत महिन्यात वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांच्या दारी खेटे मारणारे हेच अधिकारी - कर्मचारी आज अरेरावीची भाषा करीत आहेत. दुरूस्तीच्या कामावर अधीक्षक अभियंता यांचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाचा कडाका आणि त्यातच वीज गायब असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अधिकच्या कामाचा भार येथील कर्मचाऱ्यावर असल्याने सेवेवरही परिणाम होत आहे. एका वायरमनकडे तब्बल १० ते १५ रोहित्रांचा भार आहे. क्षुल्लक कारणांसाठी शहरात वीजपुरवठा खंडित होत आहे. याचे गांभीर्य ना वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे ना कंत्राटदारांना, ग्राहक मात्र त्रस्त आहेत. (प्रतिनिधी)
बीड शहर पाच तास अंधारात
By admin | Updated: April 8, 2016 00:28 IST