औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषद स्थापनेला जवळपास ३ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कायंदे यांनी पदभार स्वीकारला. पाणी प्रश्नाला प्राधान्य देऊन कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिल्लोड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अशोक कायंदे यांच्याकडे सातारा- देवळाई नगर परिषदेचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. पहिल्या दिवशी त्यांनी कर्मचाऱ्यांची ओळख करून घेत कामाचे नियोजन सांगितले. सातारा व देवळाई अशा दोन ठिकाणांहून नगर परिषदेचा कारभार चालविला जात आहे. परिसरात मध्यवर्ती ठिकाणी जागा घेऊन तेथे कार्यालय सुरू केले जाणार आहे. ग्रामपंचायतीतील रेकॉर्ड हे नगर परिषदेत वर्ग करण्याचे काम सुरू असून, लवकरच नगर परिषदेची वेबसाईट तयार होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आपल्या परिसरातील व मालमत्तेची अथवा इतर माहिती अपडेट ठेवता येणार आहे. आता प्रशासक विजय राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कायंदे, असे दोन अधिकारी निवडणूक होईपर्यंत काम पाहणार आहेत. नागरिकांच्याही आशा उंचावल्या असून, ग्रामपंचायत आणि नगर परिषदेमधील फरक जनतेपर्यंत अद्याप पोहोचलाच नाही. कोणीही असो, पाणी द्या, असा जनतेचा टाहो आहे.
सातारा-देवळाई नगर परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी कायंदे रुजू
By admin | Updated: November 29, 2014 00:31 IST