औरंगाबाद : दलालांनी दाखविलेल्या पैशाच्या अमिषाला बळी पडून गुजरातमध्ये जाऊन एका जणाशी लग्न केलेली विवाहिता पतीची नजर चुकवून नुकतीच शहरात परतली. औटघटकेच्या लग्नासाठी ठरलेली रक्कम दलालांनी न दिल्याने विवाहितने फसवणुकीची तक्रार घेऊन शुक्रवारी जिन्सी ठाण्यात धाव घेतली. या घटनेमुळे पैशाच्या अमिषाने परराज्यातमध्ये मुली आणि महिलांना पाठवून लग्न लावणारे रॅकेट शहरात कार्यरत असल्याचे समोर आले. याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिन्सी पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला.
सीमा ( वय २५, रा. कैसर कॉलनी, नाव बदलले) या विवाहितेचा पती लुटमारीच्या केसमध्ये जेलमध्ये आहे. तीन चिमुकल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी ती स्वयंपाकाची कामे करू लागली. जेलमध्ये असलेल्या पतीला सोडविण्यासाठी सीमाला पैशाची आवश्यकता असल्याचे दलाल महिलेला समजले. आणि महिनाभरापूर्वी फरजाना (नाव बदलले) तिच्यासोबत स्वयंपाकाच्या कामाला गेली. दिवसभर सोबत काम करीत असताना तिने गोड बोलून पंधरा ते वीस दिवस गुजरातमध्ये राहून आल्यास तुला ४० हजार रुपये मिळतील,असे सांगितले. त्यासाठी ती हिंदू असल्याचे सांगून गुजरामधील एका जणाशी विवाह करावा लागेल. तेथे काही दिवस राहिल्यानंतर पळून आल्यानंतर तुला ही रक्कम देण्याची आम्ही देऊ अशी ग्वाही फरजानाने दिली. विशेष म्हणजे तिची तिन्ही मुलांचा सांभाळ करण्याची तयारी तिने दर्शविली.
यानंतर दहा हजार रुपये अॅडव्हान्स तिला दिले. ठरल्यानुसार दलाल पवनने (रा. मुकुंदवाडी) तिला गुजरातमधील पालनपुर येथे नेले. तेथे तिची ओळख नयना अशी करण्यात आली. नयनाचे वडिल मृत असून आई कॅन्सरने आजारी असल्याचे वरपक्षाला सांगण्यात आले. ४० वर्षीय पंडित नावाच्या ्चहा विक्रेत्यासोबत तिचा विवाह हिंदू पद्धतीने एका मंदीरात लावण्यात आला. यानंतर नवरदेवाकडून मोठी रक्कम घेऊन पवन औरंगाबादला परतला. लग्नानंतर पंधरा ते वीस दिवस पालनपुर येथ पतीसोबत राहिल्यानंतर आईची तब्येत खराब असल्याने तिला भेटून येऊ असे सांगून ती पतीला घेऊन आठ दिवसापूर्वी औरंगाबाद बसस्थानकावर आली.
यावेळी लघूशंकेला जाण्याचा बहाणा करून पतीची नजर चुकवून ती घरी परतली. यानंतर दलाल महिला आणि पवन यांच्याकडे तिने उर्वरित ३० हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा त्यांनी तिला पैसे देण्यास नकार दिला. आपली फसवणुक झाल्याची तक्रार घेऊन ती शुक्रवारी जिन्सी पोलीस ठाण्यात आली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे निरीक्षक फईम हाश्मी यांनी सांगितले.