औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) रवींद्र गुप्ता यांनी सोमवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनला भेट देऊन अवघ्या काही वेळेत विविध सोयी-सुविधांची मॅरेथॉन पाहणी केली. या पाहणीनंतर मराठवाड्याच्या पदरी काही तरी पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु विविध मागण्या आपल्या अखत्यारीत येत नसून रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवा, असे सांगत महाव्यवस्थापकांनी हात झटकले.महाव्यवस्थापकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच रेल्वेस्टेशनला भेट देऊन गुप्ता यांनी दादरा, सीसीटीव्ही कॅमेरा रूम, वेटिंग रूम, विश्रामगृह, रेल्वेस्टेशनची नवीन इमारत, जुन्या इमारतीसमोरील इंजिन यासह विविध सोयी-सुविधांची पाहणी केली.यावेळी नांदेड विभागाचे व्यवस्थापक ए. के. सिन्हा यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. प्रारंभी नूतनीकरण केलेल्या संयुक्त कर्मी दल बुकिंग लॉबी कक्षाचे गुप्ता यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. यानंतर आयोजित बैठकीस नगरसेवक नंदकुमार घोडेले, रेल्वे प्रवासी संघटनेचे संतोषकुमार सोमाणी, राजकुमार सोमाणी, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष आशिष गर्दे, मुनीष शर्मा, भावेश पटेल आदी उपस्थित होते. घोडेले यांनी राजस्थान, जम्मू-तावीसाठी रेल्वे सुरू करणे, अजमेर, दिल्लीसाठी रेल्वे वाढविणे, देवगिरी, नंदीग्राम एक्स्प्रेसचा कोटा वाढविणे यासह रेल्वे उपभोक्ता समितीची बैठक औरंगाबादला घेणे इ. मागण्या केल्या. मालाची निर्यात वाढविण्यासाठी कंटेनर, बोगींची संख्या वाढविण्याची मागणी ‘सीएमआयए’तर्फे करण्यात आली.पैसे दिले तरच जागारेल्वेस्टेशन परिसरातील रेल्वेची जागा मिळत नसल्याने येथील रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. महापालिकेने ठरलेली रक्कम दिली तरच रेल्वे ही जागा देईल. शिवाय रक्कम कमी करण्याचा अधिकार रेल्वे मंत्रालयास असल्याचे गुप्ता यांनी म्हटले. त्यामुळे रुंदीकरण आणखी लांबणार आहे.
मॅरेथॉन पाहणीनंतर ‘जीएम’चे हात वर
By admin | Updated: December 8, 2015 00:09 IST