कळंब : शहरातील कृषी, बांधकामसह विविध विभागातील ११ शासकीय कार्यालयास उपविभागीय अधिकाऱ्यांनी शनिवारी अचानक भेट देवून कर्मचारी उपस्थितीची वस्तूस्थिती जाणून घेतली. यावेळी विविध कार्यालयातील ८० च्या आसपास कर्मचारी कार्यालयीन कामकाजावेळी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. कळंब शहरामध्ये विविध शासकीय विभागांची तालुकास्तरीय कार्यालये आहेत. या कार्यालयाचे प्रमुखच अनेकदा जागेवर नसतात. साहेबांचाच असा कारभार असल्यावर विविध आस्थापना सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम न विचारलेलेच बरे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा चांगलाच फटका बसतो. याबाबत ग्रामस्थांतून सातत्याने तक्रारी होतात. याचीच दखल घेत, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या सूचनेनुसार कळंब उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार वैशाली पाटील यांनी शनिवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक, वीज वितरण कंपनी, पंचायत समिती, गटसाधन केंद्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग, पाटबंधारे उपविभाग, बांधकाम विभाग अशा शहरातील प्रमुख ११ कार्यालयांना सदरील पथकाने भेटी दिल्या. यावेळी जवळपास ८० पेक्षा जास्त कर्मचारी कामकाजाच्या वेळेत अनुपस्थित असल्याचे आढळून आले. यामध्ये अनेक खातेप्रमुखांचा समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
८० कर्मचारी गैरहजर
By admin | Updated: November 16, 2014 00:37 IST