औरंगाबाद : एप्रिल ते नोव्हेंबर या अवघ्या आठ महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये तब्बल ४७३ व्यक्तींना एड्स या महाभंयकर रोगाने विळखा घातल्याचे समोर आले आहे. जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समितीच्या बैठकीत ही माहिती समोर आली. एड्सला वेळीच आळा बसावा म्हणून शासन यंत्रणा व स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी बैठकीच्या अध्यक्षपदावरून अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांनी केले. जिल्ह्यामध्ये जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाच्या अधिपत्याखाली असलेल्या २३ आयसीटीसी केंद्रात एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत ४६,७९० सामान्य रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४७३ व्यक्तींना एचआयव्हीची लागण झाल्याचे निदर्शनास आले. तसेच ४९,२७० गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. त्यापैकीही १७ गरोदर मातांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर व पैठण आरोग्य केंद्र येथे एआरटी केंद्र असून, जिल्ह्यात एकूण १४,८०२ रुग्णांची एआरटी केंद्रांत नोंदणी झालेली आहे. ४,७०२ रुग्ण एआरटी केंद्रांत नियमितपणे औषधोपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी.एम. गायकवाड यांनी दिली. संजय गांधी निराधार योजनेचा पात्र एचआयव्हीबाधित व्यक्तींना व देहविक्री करणाऱ्या महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल, असे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भटकर, डॉ. आर.एन. देशमुख, डॉ. एन.जे. पाडळकर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अंजली पाथ्रीकर, डॉ. विनायक मुंडे, डॉ. संजय देवरे, डॉ. संदीप भवरे, अशोक शिंदे, अप्पासाहेब उगले, ज्योती वाडेकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगेश गायकवाड, जिल्हा पर्यवेक्षक संजय पवार उपस्थित होते.
आठ महिन्यांमध्ये ४७३ जणांना एड्सचा विळखा
By admin | Updated: December 18, 2015 00:19 IST