लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मार्च महिना संपत आला असून, पाराही वाढत चालला आहे. शहरात पाण्याची मागणी दुप्पट झाली आहे. महापालिका समाधानकारक पाणी देऊ शकत नाही, त्यामुळे नगरसेवकांकडून आतापासूनच पाण्यासाठी ओरड सुरू झाली. सोमवारी सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्न गंभीर बनला. त्यामुळे पैठण रोडवरील ज्या कंपन्यांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येतो त्या कंपन्यांच्या पाण्यात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. हळूहळू या पाण्यात आणखी कपात करण्याची घोषणाही महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली.
शहराला दररोज २०० एमएलडी पाण्याची गरज असताना महापालिका चार दिवसाआड, आठ दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. पाणी प्रश्न दरवर्षी उन्हाळ्यात पेट घेतो. यंदा मार्च महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यात पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये महापालिका कुठे चार दिवसाआड, तर कुठे सहा दिवसाआड पाणी देत आहे. सर्वसामान्य नागरिक पाणीपुरठ्यावर अजिबात समाधानी नाहीत. शहराच्या चारही बाजूने गुंठेवारीअंतर्गत ७० ते ८० नवीन वसाहती तयार झाल्या आहेत. या वसाहतींना मागील अनेक वर्षांपासून महापालिका टँकरने पाणीपुरवठा करीत आहे. सोमवारी सर्वसाधारण सभेत महिला नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर ओरड सुरू केली. विविध पक्षाच्या नगरसेवकांनीही आपल्या वॉर्डातील समस्या सांगितल्या. दररोज १३० ते १३५ एमएलडी पाणीच शहरात येते. या पाण्याचे अत्यंत बारकाईने नियोजन करून वाटप करण्यात येत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत महापालिकेच्या मुख्य लाईनवरून विविध कंपन्यांना पाणी देण्यात येते. या पाण्यात कपात करण्यात यावी. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, कंपन्यांना पाणी कसे काय देता, असा रोषही नगरसेवकांनी व्यक्त केला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी कंपन्यांना देण्यात आलेल्या पाण्यात २० टक्के कपात करण्यात यावी, असे आदेश प्रशासनाला दिले.