जि.प. उपाध्यक्षांचा घुग्घुस नगर परिषदेला विरोध
By Admin | Updated: August 7, 2014 23:52 IST2014-08-07T23:52:56+5:302014-08-07T23:52:56+5:30
घुग्घुस नगर परिषद स्थापनेबाबत राष्ट्रवादीचे जि.प. उपाध्यक्ष तथा भाजपच्या सदस्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये विरोधी ठराव मंजूर केल्याची बाब माहितीच्या अधिकारातून पुढे आली.

जि.प. उपाध्यक्षांचा घुग्घुस नगर परिषदेला विरोध
घुग्घुस : घुग्घुस नगर परिषद स्थापनेबाबत राष्ट्रवादीचे जि.प. उपाध्यक्ष तथा भाजपच्या सदस्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये विरोधी ठराव मंजूर केल्याची बाब माहितीच्या अधिकारातून पुढे आली. त्यामुळे या दोघांच्या भुमिकेचा घुग्घुस नगर परिषद संघर्ष समितीने पत्रपरिषद घेऊन निषेध केला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून शासनाने तात्काळ माहित मागितली तरी दीड वर्ष होवूनसुद्धा माहिती पाठविण्यात आली नसल्याने कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नगर स्थापना होईपर्यंत विविध प्रकारचे तीव्र आंदोलन करून संघर्ष करण्याची घोषणा केली. ८ आॅगस्टला घुग्घुस बंद आणि दुपारी रस्ता रोको आणि सायंकाळी ५ वाजता गांधी चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
घुग्घुस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याची मागणी बऱ्याच वर्षापूर्वीची आहे. भाजपच्या तत्कालिन आमदारांनी घुग्घुस नगर परिषद अस्तित्वात आल्याची घोषणा येथील सभेत तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केली होती. नंतर १२ वर्षाचा कार्यकाळ होवून नगर परिषदची निर्मिती झाली नाही. प्रत्येक निवडणुकीदरम्यान नगर परिषद बनविण्याचे आश्वासन दिले तर घुग्घुस ग्रामपंचायतमधील निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना निवडून दिले आणि ग्रा.पं. मध्ये सत्तेवर येताच आपला पाच वर्षाचा कार्यकाल झाल्यानंतर नगर परिषदेची निर्मिती होवू नये अशा ठराव घेतला.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत १६ जानेवारीला झालेल्या ठरावात घुग्घुस नगर परिषद निर्मिती विरोधात ५(३) नुसार ठराव पारित केला. या ठरावाचे सूचक भाजपच्या ज्येष्ठ जि.प. च्या सदस्या संध्या गुरनुले तर अनुमोदक म्हणून जि.प. चे उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी भूमिका पार पाडली. ते दोघेही अन्य जि.प. क्षेत्राचे सदस्य असताना त्यांचा विरोध का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घुग्घुस नगर परिषद स्थापनेबाबत ग्राम विकास व जलसंधारण विभाग मुंबई यांच्याकडून १६ फेब्रुवारी २०१३ जि.प. चंद्रपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तीन प्रपत्रकाचे नमुने १० दिवसाचे आत भरून पाठविण्याचे निर्देश दिले. मात्र ती माहिती अजूनही मंत्रालयाला दिली नाही. दोषी व कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी अजूनही मंत्रालयाला दिली नाही. दोषी व कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली.
पत्रपरिषदेत संघर्ष समितीचे अध्यक्ष शामराव बोबडे, लक्ष्मण सादलावार, शेषराव ठाकरे, चिना नलभोगा, राजू रेड्डी, रोसन पचारे, इबादुल सिद्दीकी, राकेश जैस्वाल, गणेश उईके, रामेश्वर हिकरे, प्रभाकर चीककर, दिलीप पिटलवार, सिणू गोस्कुला, बापु शिसाग्र आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)