सोनियानगरच्या महिलांचा एल्गार
By Admin | Updated: May 6, 2015 01:20 IST2015-05-06T01:20:05+5:302015-05-06T01:20:05+5:30
शहरातील सोनियानगर मधील घनकचरा प्रकल्पा पुढील आणि बगीचाच्या प्रस्तावित जागेवर मागील अनेक दिवसांपासून वास्तव्य करणाऱ्या ...

सोनियानगरच्या महिलांचा एल्गार
राजुरा : शहरातील सोनियानगर मधील घनकचरा प्रकल्पा पुढील आणि बगीचाच्या प्रस्तावित जागेवर मागील अनेक दिवसांपासून वास्तव्य करणाऱ्या १०० अतिक्रमणधारकांना स्थायी पट्टे देऊन त्याचे पूनर्वसन करणार नाही तो पर्यंत श्रमिक एल्गारचा संघर्ष सुरुच राहील. प्रशासनाने याची दखल घेऊन अतिक्रमणधारकांचे पूर्नवसन करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी दिला.
राजुरा उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी शेकडो महिलाचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा विश्रामगृह गेटवरच पोलिसानी अडविला. त्यानंतर पाच प्रतिनिधींना निवेदन देण्यासाठी सोडण्यात आले. यावेळी अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. धनाड्याचे अतिक्रमण केव्हा काढणार, गरीबांच्या घरांवर बुल्डोजर चालविली, मोठ्या अतिक्रमण धारकांवर का नाही, असा सवाल त्यांनी एसडीओंना केला.
अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी घनकचरा प्रकल्पापुढील अतिक्रमण धारक त्याच ठिकाणी राहतील, असे म्हणत अल्का चंद्रशेखर यांच्या सूचनेवरुन या झोपडपट्टीला ‘संघर्ष नगर’ असे नाव घोषित केले. प्रस्तावित बगीचाच्या जागेवरील अतिक्रमण धारकही तिथेच राहतील. अतिक्रमणग्रस्तांना न्याय द्या, असे म्हणत बारा मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
लघु वेतन गृहनिर्माण सहकारी संस्थेमधील बिना परवानगीने हडपलेल्या जमिनधारकांवर कारवाई करा, इंदिरानगर, सोनियानगर, रमाबाईनगर, बेघरवस्ती, चुनाभट्टी येथील नागरिकांना पट्टे द्यावे, चुनाभट्टी मधील बालवाडीसाठी आरक्षित ११ हजार फूट जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे, जिल्हा मध्यवर्ती बँक, राजुराचे अतिक्रमण तोडण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
याप्रसंगी अल्काताई चंद्रशेखर, विजय सिद्धावार, संगीता गेडाम, चरणदास नगराळे, मिलिंद गड्डमवार, रंगराव कुळसंगे, महिपाल मडावी, उमेश मारशेट्टीवार, राजू डोहे, बादल बेले, मालता मडावी, तुळसाबाई खडसे, रंजिता खडसे, प्रकाश खडसे, मनप्रित सिंधू, मंदा कोटनाके उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)