जिल्ह्यात येणार ‘श्वेतक्रांती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात शेती करणाऱ्यांची संख्या मोठी असतानाही दुग्ध उत्पादनाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र कृषीपुरक व्यवसायांना ...

जिल्ह्यात येणार ‘श्वेतक्रांती’
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात शेती करणाऱ्यांची संख्या मोठी असतानाही दुग्ध उत्पादनाकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र कृषीपुरक व्यवसायांना चालना मिळावी, दुग्ध उत्पादन व संकलनासाठी जिल्ह्यातच पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात, याकरिता २२९ गावांमध्ये राज्य शासन आणि मदर डेअरी फु्रट्स अॅण्ड वेजीटेबल कंपनीच्या संयुक्त पुढाकारातून लघु प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रामाणिकपणे राबविल्यास जिल्ह्यात ‘श्वेतक्रांती’ येण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.
जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र मागील पाच वर्षांच्या कालावधीत कापूस व अन्य कडधान्य पिकांच्या लागवडीचे क्षेत्र वाढले. या पिकांसाठी काही प्रमाणाात सिंचनाची सुविधा झाल्याने चाऱ्याची उपलब्धता आहे. परंतु, जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पारंपरिक शेती करून दुग्ध उत्पादनासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत आहे. अर्थात राज्य शासनाने या क्षेत्राला चालना देण्यासाठी आजपर्यंत ठोस प्रयत्न केले नव्हते. त्यामुळे विदर्भामध्ये सर्वात कमी दुग्ध उत्पादन करणारा जिल्हा म्हणून ओळखल्या जाते. या जिल्ह्यात वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातून दुधाचा पुरवठा होतो. शेतकºयांची इच्छा असूनही शासनाकडूनही योग्य पाठबळ आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अपयश आल्यामुळे दुग्ध उत्पादनात हा जिल्हा माघारला. दुग्ध उत्पादनात मागे पडलेल्या जिल्ह्यात मदर डेअरी प्रकल्प सुरू करून त्यासाठी ११ जिल्ह्यातील २ हजार ९३६ गावांचा समावेश विशेष प्रकल्प कार्यक्षेत्रात करण्यात आला. यात जिल्ह्यातील २३९ गावांचा समावेश आहे.
तपासणीसाठी येणार तज्ज्ञ समिती
मदर डेअरी प्रकल्पांतर्गत समावेश झालेल्या गावांची पाहणी करण्याकरिता तज्ज्ञ समिती लवकरच जिल्ह्यात येणार आहे. पाहणीनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधित अहवाल राज्य शासनाकडे जाईल. त्यानंतर या प्रकल्पाला चालना मिळणार असल्याची माहिती आहे.