‘त्या’ भ्रष्टाचारासंबंधी कारवाई केव्हा होणार ?
By Admin | Updated: March 28, 2016 01:00 IST2016-03-28T01:00:28+5:302016-03-28T01:00:28+5:30
तालुक्यातील भेंडवी ग्रामपंचायतीमध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाला असून पोलिसात तक्रार देऊनही कुठलीही कारवाई होत नाही.

‘त्या’ भ्रष्टाचारासंबंधी कारवाई केव्हा होणार ?
बी.यू.बोर्डेवार/शंकर मडावी ल्ल राजुरा
तालुक्यातील भेंडवी ग्रामपंचायतीमध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाला असून पोलिसात तक्रार देऊनही कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे भेंडवीचे ग्रामवासी आनंद गेडाम व गावातील नागरिक पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून निवेदन देणार आहे.
राजुरा तालुक्यातील भेंडवी गावात फेरफटका मारला असता गावातील नागरिकांनी गावाच्या समस्या पत्रकारांसमक्ष मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने ५८ लाखांची पाण्याची टाकी मागील दोन वर्षापासून धूळ खात आहे. राजुरा येथील पाणी पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या टाकी बांधकाम करताना रोख पुस्तकात अजूनही नोंदी नाही. रोख पुस्तक कोरे आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले. अजूनपर्यत ही पाण्याची टाकी ग्रामवासीयांना हस्तांतरित केलेली नाही. त्यामुळे येथील महिला पाण्यासाठी त्रस्त आहेत.
या ठिकाणी अंबुजा फाऊंडेशनने एक बंधारा बांधला. त्या बंधाऱ्याला लोखंडी दारच नाही. या बंधाऱ्याच्या बाजुला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. शतकोटी वृक्ष लागवड योजना राजुरा तालुक्यात राबविण्यात आली. ती योजना रोजगार हमी अर्धे-तुम्ही अर्धे आम्ही या प्रमाणेच असून वृक्ष नसताना वृक्षाच्या देखभालीचा खर्च ग्रामपंचायतीने केलेला आहे. सोलर लाईट, टावर बंद पडलेले असून शौचालय तयार करण्यासाठी आणलेल्या विटा धूळ खात पडलेल्या आहे. अस्वच्छ नाल्या असून आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने काहीच उपाययोजना केलेली नाही. या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्या. शासकीय अधिकारी यांनी अहवाल दिला. परंतु राजुराचे संवर्ग विकास अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे अजूनपर्यंत तक्रार झालेली नाही. राजुराचे संवर्ग विकास अधिकारी अहवाल पाठवून मोकळे झाले. चंद्रपूरचे संबंधित अधिकारी किंवा संवर्ग विकास अधिकारी यांनी तक्रार दिली तर गुन्हा दाखल करू, असे पोलीस अधिकारी म्हणतात. लाखोंचा भ्रष्टाचार होवूनही कारवाई होत नसल्याचे पाहून गावातील नागरिक न्यायालयात दाद मागणार आहेत.
पोलीस पाटलांवरच आहेत गुन्हे दाखल
राजुरा : पोलीस पाटील पोलिसांची व त्या गावाची चांगली प्रतिमा सांभाळीत असतो. परंतु पोलीस पाटलावरच गुन्हे दाखल असेल तर ते गावाला काय न्याय देणार. अशीच परिस्थिती भेंडवीत आहे. त्यांना पोलीस पाटील करू नये, यासाठी येथील १०० नागरिकांनी तक्रार केली. तक्रारीत म्हटले आहे की संतोष सलाम यांच्यावर गुन्हे दाखल असून अशा व्यक्तीला पोलीस पाटील पदावर नियुक्ती केल्यास गावातील शांतता व सुव्यवस्था भंग होऊन गावातील वातावरण दूषित होईल. आनंद गेडाम, भगवान मडावी, सुभाष उईके, सुनीता गेडाम, शशिकला परचाके, पुष्पा गेडाम, जंगुबाई मंगाम यासह शंभर नागरिकांनी तक्रार करूनही संतोष सलाम हे पोलीस पाटील नियुक्त झाले. या पोलीूस पाटलावर भादंवी ४२०, ४६८, ४७१, २०० अन्वये गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीसुद्धा भादंवीच्या ५०९, २९४, ५०६, ३२३, १४३, १४७, ४२७, २९४, ६०६, १४३, ४७७, ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यातून ते निर्दोष मुक्त झाले. या तक्रारीमध्ये जातीचा घोळ असल्याचेसुद्धा म्हटले आहे. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला पोलीस पाटील कसे नियुक्त केले, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. विशेष म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडेसुध्दा २४ नोव्हेंबर २०१५ ला याची रितसर तक्रार करण्यात आली. परंतु अजूनपर्यंत साधी चौकशीही झाली नाही, या बद्दल गावकरी खंत व्यक्त करीत आहेत.