खासदार साहेब दिसले काय? नागरिकांचा प्रतिप्रश्न
By Admin | Updated: March 12, 2015 00:43 IST2015-03-12T00:43:24+5:302015-03-12T00:43:24+5:30
लोकसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण होत आहे. ब्रह्मपुरी तालुका गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात येत असून या क्षेत्रातून खासदार अशोक नेते बहुमताने निवडून आले.

खासदार साहेब दिसले काय? नागरिकांचा प्रतिप्रश्न
ब्रह्मपुरी : लोकसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण होत आहे. ब्रह्मपुरी तालुका गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात येत असून या क्षेत्रातून खासदार अशोक नेते बहुमताने निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर ते कधी या शहरात फिरकलेलेच नाही. त्यामुळे येथील नागरिक एकमेकांना प्रतिप्रश्न करीत आहेत, तो म्हणजे खासदार साहेब दिसले काय?
गडचिरोली लोकसभा क्षेत्रात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. दिल्लीवरुन मूळ गावी गडचिरोलीला जाताना ब्रह्मपुरीवरुनच जावे लागत असते तरी, खासदार साहेब ब्रह्मपुरीत कधीच दिसले नाही. खासदार ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून हजारो मतांची लिड घेऊन विजयी झाले. मात्र विजयाच्या रॅलीनंतर खासदार साहेबांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. खाजगी एक दोन कार्यक्रम वगळता सार्वजनिक कार्यक्रम किंवा उपक्रम दिसून आले नाही. दिल्लीत व महाराष्ट्रात सत्ता खासदारांच्या पक्षाची आहे. परंतु, अनेक प्रश्न सातत्याने रखडली आहेत.
महत्वाचा प्रश्न म्हणजे ब्रह्मपुरीचा रेल्वे प्लॉटफार्म कमी उंचीचा आहे. हे काम केंद्राशी संबंधित असूनही व सत्ता असूनही मार्गी का लागत नाही, हा मोठा प्रश्न आहे. रेल्वे प्लॉटफार्ममुळे अनेक नागरिकांचा हिरमोड होत आहे. स्त्रिया, नागरीक, लहान मुले प्रवास करण्याचे टाळतात. कारण रेल्वेचे प्लॉटफॉर्म उंच झाले नाही व अपघात होण्याची शक्यता असते.
खासदार साहेब ब्रह्मपुरीला तुम्ही दिसले नाही तर मतदार सहन करतील पण किमान तुमच्या कार्यातून प्लॉटफार्मची उंची वाढली पाहिजे या अपेक्षेत मतदार तुमची आठवण करुन खासदार साहेब दिसले काय, असा उपाक्षसाने प्रश्न विचाराला जात आहे.
खासदार साहेबांच्या क्षेत्रात सध्या भाजपाचे आमदार नाही त्यामुळे गांधाराची भूमिका तुम्हाला पार पाडायची आहे. परंतु कर्णधार अलिप्त असेल तर विकासकामे, पक्षबांधणी, कार्यकत्यांना दिलासा कोण देणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्रह्मपुरीत अनेक रस्ते, नाल्या, नगरपरिषदेच्या अखत्यारित आहेत. परंतु, आपण येऊन निधी दिला तर अनेक नगर विकासकामांना गती मिळेल. नगरपालिकेतील सत्ता पक्षाला समाधान वाटेल. काही महत्वाच्या कामात गोसीखुर्द धरणाचे बांधकाम अपूर्ण आहे. गोसीखुर्द धरणाची स्थिती फार वाईट आहे. अशा स्थितीत खासदार अशोक नेते यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)