वसंत खेडेकर। लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : काही अविचारी लोक नको तेथे अवास्तव धाडस करून विनाकारण आपला जीव गमावतात. धावत्या रेल्वेगाडीत, गाडीच्या उघड्या दारावर अगदी काठावर उभे राहून हवेशी बात करणे हे त्यातीलच एक नेहमीचे आपल्या अवती भवती दिसणारे धाडस. या अशा धाडसापायी अनेकांचे जीव गेले व जात आहेत. दोन दिवसापूर्वी, माजरी रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर झुडपात एका अनोळखी युवकाचे फुगून असलेले प्रेत आढळून आले. हे रेल्वे स्थानक बल्लारशाह रेल्वे पोलिसांच्या कक्षेत येत असल्याने पोलिसांनी त्या प्रेताचा पंचनामा केला. एकंदरीत तेथील स्थिती बघता, हा युवक धावत्या गाडीतून पडून मृत पावला असावा. या निष्कर्षावर पोलीस पोहचले. तो कोण, कुठला हे कळले नाही. रेल्वेने पडून मरण पावल्याच्या घटना होत असतात. याला कारणीभूत बळी पडणारे प्रवाशी व त्यांचा निष्काळजीपणा आणि विनाकारण अंगी आणलेले धाडस हेच असते. डब्यात बसायला भरपूर मोकळी जागा असूनही अतिउत्साही प्रवाशी जाणून दारावर बसतात नुसते बसतच नाही, तर हातवारे-पायवारे करतात. पूर्ण शरीर डब्याबाहेर झोकून देतात. मग, त्यांना रस्त्यात येणाऱ्या सिग्नल खांबांची भिती किंवा अन्य कुणाची भिती वाटत नाही. त्यात थोडक्यात निभावले तर ठीक नाही तर त्याचे वाईट परिणाम होतात हे आपण बघतोच. काही उत्साही बाप आपल्या लहान लेकरांनाही दारावर घेऊन बसतात. याला काय म्हणावे? त्यांना सांगणार कोण? टीसीचा डब्यात फेरफटका असला की, ते त्यांची कानउघडणी करतात. पण, ते तेवढ्यापुरतेच असते. जी गोष्ट रेल्वेची, तीच पण थोड्या फार फरकाने सडक मार्गावरुन धावणाऱ्या आटो व काळ्यापिवळ्या प्रवाशी गाड्यांची! त्या गाड्यांमध्ये बसण्याची असलेल्या क्षमतेच्या तीन चार पटीने प्रवाशी कोंबतात. एवढे की, चालकाच्या दोन्ही बाजूला दोन दोन जणांना बसविले जाते. या प्रकाराने वाहनाच्या चालकाला पुरेसे नियंत्रण करण्याला मोकळिक मिळावी, अशी जागाच मिळत नसल्याने आणिबाणी प्रसंगी वाहन अनियंत्रीत होवून अपघात घडतो. प्रवाशांचे व चालक यांचे जीव जातात. वाहनात किती प्रवाशी बसवावे याचे वाहतूक नियम आहेत, पण ते पाळल्या जात नाही. पोलिसांना हे सर्व दिसत असूनही अर्थकारणामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करतात. तशीच गोष्ट मार्गावर धावणाऱ्या दोन चाकी वाहनांची. स्कुटी वा बाईकवर दोनजण बसण्याचा नियम आहे. मात्र या नियमाला बंगल देत दुचाकी वाहनांवर तीन ते चारजण बसविण्यात येत असतात. साधारणत: नवरा, बायको, दोन वा तीन मुलं व सोबतीला गाडीच्या दोन्ही बाजूंना भल्या मोठ्या वजनी बॅगा! कोंबून बसलेल्या लहान लहान मुलांना सहजपणे श्वासही घेता येऊ नये सा कोंडमारा. अशा अवस्थेत भर उन्हात काही जण ३०-४० किलोमीटरचा प्रवास करतात. सडक अरुंद, खडतर रोड असले की अपघाताची शक्यता अधिक! पण, अति उत्साह, बेफिकीरी, पैसे आणि वेळ वाचविण्याची वृत्ती- त्यातून अघटीत घडले की हानी आपलीच होते, ही बाब असे लोक ध्यानीच घेत नाही. आणखी एक प्रकार नदीच पोहण्याचा. आपण पोहण्यात तरबेज आहोत असे प्रत्येक पोहणाऱ्यांना वाटत असते. त्यामुळे, पाण्यावर आपली हुकूमत आहे अशा आविर्भावात पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरतात दोन दिवसांपूर्वी वर्धा नदीच्या बल्लारपूर येथील गणेश विसर्जन घाटावर आंघोळीला पाण्यात उतरलेल्या नागपूरच्या १७ व १९ वर्षीय भावंडांचा बुडून जीव गेला. ते येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्नात आले होते. त्यांच्या या निधनाने लग्नघरी शोककळा पसरल्या. अविवेक, अति उत्साह यातून अशा अप्रिय घटना घडतात. ‘हऽऽ, क्या होता है’ अशी दर्पोक्ती व अति आत्मविश्वासातून असे होते. पण, काळ सारखा राहत नाही आदमी को चाहिए वक्त से डरकर रहे, कौन जाने किस घडी वक्त का बदले मिजाज’ असे शाहीर लुधियानवी यांनी लिहून ठेवले, ते उगीच नव्हे! त्यामुळे कुठेही असो, सावधानी बाळगणे हेच उत्तम.
जिवावर बेतणारे असे धाडस काय कामाचे?
By admin | Updated: May 31, 2017 01:47 IST