नरकयातना सोसताना झालेल्या त्या जखमांचे काय?
By Admin | Updated: July 27, 2015 02:59 IST2015-07-27T02:59:13+5:302015-07-27T02:59:13+5:30
आयुष्य जगताना चुकीच्या वाटेनं पावलं पडलीत आणि ही वाट थेट बदनाम वस्तीत घेऊन गेली. दलाल आणि ग्राहकांकडून

नरकयातना सोसताना झालेल्या त्या जखमांचे काय?
कुंटणखान्यात शुकशुकाट : कारवाईनंतरही यातनातून मुक्ती नाही
रुपेश कोकावार ल्ल बाबुपेठ (चंद्रपूर)
आयुष्य जगताना चुकीच्या वाटेनं पावलं पडलीत आणि ही वाट थेट बदनाम वस्तीत घेऊन गेली. दलाल आणि ग्राहकांकडून होणारं शोषण मुकपणे गिळत जगणारे कोवळे जीव पोलिसांच्या कारवाईनंतर काही काळापुरते मुक्त होतात खरे, पण देहविक्रीच्या व्यवसायात सोसलेल्या नरक यातनांचा हिशेब कोण चुकविणार, काळजावर भळभळणाऱ्या त्या जखमांचे काय, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात.
हैद्राबाद-तेलंगाणा पोलिसांनी येथील गौतमनगरातील देहविक्री करणाऱ्यांच्या वस्तीत धाड टाकली. या धाडीनंतर या कुंटनखान्यात सध्या शुकशुकाट पसरला आहे. पूर्व अनुभव लक्षात घेता, येत्या काही दिवसांतच या परिसर पुन्हा एकदा ग्राहकांच्या गर्दीने फुलून येणार आहे. पुन्हा नव्या मुलींना या कुंटनखान्यात आणल्या जाणार आहे. असे वर्षानुवर्षे सुरू आहे. परंतु हा कुंटनखानाच बंद व्हावा, यासाठी कोणत्याही उपाययोजना आजवर करण्यात आल्या नाहीत. मग हा कारवाईचा फार्स कशासाठी? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पूर्वी गौतमनगर परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांच्या दोन-तीन झोपड्या होत्या. आज गौतमनगर परिसरात ६० झोपड्या उभ्या आहेत. यात दिवसरात्रं व्यवसाय केल्या जात आहे. या कुंटखान्यात काही महिला व मुली स्वेच्छेने देहविक्री करीत होत्या. मात्र मागील काही वर्षांत जादा पैसे कमविण्यासाठी येथे कोवळ्या मुलींना या व्यवसायात जबरीने गोवल्या जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या व्यवसायात गोवल्या जाणाऱ्या मुलींना घरकामाचे तसेच चांगली नोकरी लावून देण्याचे आमिष दाखऊन चंद्रपुरात आणल्या जाते आणी नंतर जबरीने तिच्याकडून देहविक्रिचा व्यवसाय करुन घेतल्या जात असल्याचे सत्यही समोर आले आहे.
मागील काही वर्षात या वस्तीवर तेंलगाणा पोलिसांनी (पूर्वीचे आंध्र पोलीस) टाकलेली ही चौथी धाड आहे. या अगोदर ही या वस्तीवर ३ वेळा धाडी घालण्यात आल्या आहेत. चारही वेळी धाड टाकून पोलिसांनी या व्यवसायात गुंतलेल्या मुलींना आंध्रात परत नेले. मात्र समाजाकडून होणारी हेटाळणी व त्यातून आलेल्या नैराश्यापोटी अंतर्बाह्य उद्ध्वस्त झालेल्या या मुली पुन्हा याच व्यवसायात परत आल्याची अनेक उदाहरणेदेखील आहेत. गंभीर बाब ही की, कारवाईनंतर काही दिवसांतच पुन्हा गौतमनगर परिसरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू होतो. येथे जुन्या आणि काही नव्या मुलींना आणून व्यवसाय केला जातो. याची कल्पना स्थानिक पोलिसांना असते. मात्र त्या मुली कुठून आल्या, त्यांना कुणी आणले याची साधी चौकशी करण्याचे सौजन्यही पोलीस दाखवत नाहीत.
पोलिसांनी जर या वस्तीवर पाळत ठेऊन मुलींची चौकशी केली, तर गंभीर प्रकार उघडकीस येऊन अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचविता येईल, असे सुज्ञांचे मत आहे.
अनेकींची अन्य जिल्ह्यात विक्री
या कुंटणखान्यावर तेलंगाणा पोलिसांनी मोठ्या स्वरूपाच्या कारवाया केल्या, हे विशेष. मात्र या कारवाया दोन ते तीन वर्षातून एकदा केल्या जातात. त्यामुळे जबरीने या व्यवसायात आणलेल्या मुलींना स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी वर्ष-वर्ष वाट पहावी लागते. या काळात अनेक मुलींची येथून अन्य जिल्ह्यात विक्री करण्याचेही प्रकार घडतात. सर्वार्थाने निराधार बनलेल्या या मुलींपुढे कोणताही मार्ग उरत नाही.
प्रतिबंधक कारवायांच्या वेळीच पोलिसांना या कुंटणखान्याची होते आठवण
अधूनमधून या परिसरात पोलिसांचा वावर दिसून येतो. पोलिसांचा हा वावर मुलींबद्दल माहिती घेण्यासाठी नव्हे तर केवळ वरिष्ठांकडून प्रतिबंधक कारवाईसाठी आलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी असतो. वरिष्ठांकडून प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश मिळाल्यानंतर अशा कारवाया करायच्या कुठे, असा प्रश्न जेव्हा पोलिसांना पडतो, तेव्हा पोलिसांना कुंटनखान्याची आठवण येते आणि मग तेथे जाऊन अशा कारवाया केल्या जातात.
सर्वाधिक महिला-मुली आंध्रातील
देहविक्रीच्या व्यवसायात गुंतविण्यात आलेल्या सर्वाधिक महिला व अल्पवयीन मुली आंध्रप्रदेशातील आहेत. आहे त्यामुळे स्थानिक पोलीस या विषयात गंभीर नाहीत. त्या परप्रांतातील आहेत, आपल्याला काय घेणेदेणे, अशा मानसिकतेतून स्थानिक पोलीस या शोषणाकडे कायम दुर्लक्ष करतात, असे दिसून येते. त्यातून दलालांची हिम्मत वाढून ते आंध्र प्रदेशातील अनेक मुलींना येथे देहविक्रीसाठी आणत आहेत.