बाजारपेठेतील दुकानदारांच्या वजनात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:29 IST2019-03-31T00:28:37+5:302019-03-31T00:29:11+5:30
आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहे. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडांचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले.

बाजारपेठेतील दुकानदारांच्या वजनात घोळ
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहे. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडांचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. मात्र पॅकींगमध्ये असलेले खाद्य पदार्थ व इतर वस्तू एमआरपी दरानेच विकले जात असल्याचेही लोकमतच्या पाहणीत आढळून आले.
चंद्रपुरात विविध दुकानात पॅकींगमध्ये असलेले खाद्य पदार्थ, साबण व अन्य वस्तूंची खरेदी केल्यास दुकानदारांकडून एमआरपी किंमतच घेतली जाते. मात्र तांदूळ, साखर, गहू व इतर किराणा वस्तू मोजून देताना काही दुकानात इलेक्ट्रानिक तराजूचा वापर होताना दिसतो.
तर काही ठिकाणी वजनमापे ठेवलेल्या साध्या तराजूचा वापर होत असल्याचेही दिसून येते.
विशेष म्हणजे, अनेक दुकानातील वजनांचे पासींगच केले नसल्याची माहिती आहे. अनेक दुकानात वर्षानुवर्षापासून तेच ते एक किलो, दोन किलो, पाच किलो, दहा किलोचे वजन वापरले जात आहे. बदाम, काजू, खसखस यासारख्या महागड्या वस्तू ग्रॅमनेच खरेदी केल्या जातात. मात्र काही ठिकाणी ग्रॅमच्या वजनाऐवजी एक रुपया, पाच रुपयांची नाणी वापरली जात आहे. काही दुकानात तर केवळ लोखंडच तराजूमध्ये ठेवले जाते आणि वस्तू त्यानेच मोजून दिल्या जातात. यात ग्राहकांची लूट होत असल्याचे दिसून आले.संबंधित विभागाने ग्राहकांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व वजनमापांची नियमित तपासणी करणे गरजे आहे.
भाजीविक्रेत्यांकडूनही लूट
भाजीमार्केटमध्ये फेरफटका मारला असता या ठिकाणी तर अंदाजानेच भाजीपाला विकला जात असल्याचे दिसून येते. काही भाजीविक्रेते भाजीपाला मोजून देतात. मात्र अनेकांकडे अधिकृत वजनाऐवजी दगड, लोखंड यांचा वापर केला जात असल्याचे दिसून येते .एका ठिकाणी ३० रुपये किलो याप्रमाणे टमाटर असेल तर तेच टमाटर काही फुटांवर असलेल्या दुसऱ्या भाजीविक्रेत्यांकडे २० रुपये प्रमाणे विकले जाते. तेथीलच भाजीविक्रेत्याला याबाबत विचारले असता वजनात घोळ करून कमी किमतीत टमाटर विकले जात असल्याचे सांगितले.
वजनांची पासिंग नाही
स्दरवर्षी दुकानदारांकडे असलेल्या वजनांची पासिंग होणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित विभागाकडून दुकानदारांकडील वजनाची पासिंंगच केली जात नाही. वर्षानुवर्ष एकच वजन दुकानदार वापरत असल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहक भरडला जात आहे.
दरात मोठी तफावत
तांदूळ, दाळ, गहू, साखर व इतर वस्तूंच्या दरात विविध दुकानात तफावत असल्याचे दिसते. प्रत्येक वस्तूची किंमत विविध दुकानांमध्ये वेगवेगळी असल्याचे दिसून येते. याबाबत एका किराणा दुकानदाराला विचारले असता त्याने वस्तूच्या क्वॉलिटीमुळे ही तफावत असल्याचे सांगितले. मात्र वजनातही घोळ असण्याची शक्यता यात आहे.