मजुरांच्या स्थलांतरामुळे आठवडी बाजारावर अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST2021-02-20T05:21:50+5:302021-02-20T05:21:50+5:30
राजोली : या परिसरातील शेकडो मजुराचे जत्थे मिळेल त्या वाहनाने नजीकच्या ...

मजुरांच्या स्थलांतरामुळे आठवडी बाजारावर अवकळा
राजोली : या परिसरातील शेकडो मजुराचे जत्थे मिळेल त्या वाहनाने नजीकच्या तेलंगणा आणि आध्रप्रदेश येथे मिरची व कापूस वेचणीच्या कामाकरिता गेले. गावे, पाडे, वस्त्या ओस पडल्या आहेत. यावर्षी प्रथमच शाळकरी मुलामुलीसह कुटुंब घेऊन शेकडो शेतकरी व शेतमजूर कामाच्या शोधात स्थलांतरित झाले. त्यामुळे आठवडी बाजार आणि गावखेड्यातील लहान मोठया व्यवसायावर अवकळा पसरली आहे.
कोरोना संक्रमणाच्या काळात लहान मोठे सर्व व्यवसाय ठप्प पडले होते. त्यामुळे नागरिकाना मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण सहन करावा लागला होता. परंतु लवकरच शेती हंगाम सुरू झाला आणि मजुरांना शेतीच्या मशागतीसोबत धान रोवणी ते कापणीपर्यंतची कामे मिळाल्याने गाव खेड्यातील अर्थव्यवस्थेला काहीशी चालना मिळाली होती. परंतु हवामान बदलामुळे धानपिकाच्या उत्पादनात निम्यापेक्षाही अधिक घट झाली. परिणामी रुळावर आलेल्या गावखेड्यातील अर्थव्यवस्थेला पुन्हा ब्रेक लागला.
परिसरात शेतीशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन किंवा उद्योग नाही. त्यामुळे या परिसरातील मजुरांना शेतीचा हंगाम संपल्यानंतर नेहमीच कामाच्या शोधार्थ भटकंती करावी लागते.परंतु यावर्षी शेतीने दगा दिल्यामुळे मजूरवर्ग व अल्पभूधारक शेतकरीहीं कामाच्या शोधार्थ आंध्रप्रदेश व तेलंगणात मिरची व कापूस वेचणीकरिता मोठ्या प्रमाणावर ट्रक, ट्रॅव्हलसारख्या वाहनाने स्थलांतरित झाले आहेत. परिणामी परिसरातील सर्वच गावे आता ओस दिसू लागली असून गावखेड्यातील दुकान व किरकोळ व्यवसाय ग्राहकाअभावी बंद पडल्याचे चित्र आहे. तर विविध वस्तुंनी सजलेल्या व नेहमी ग्राहकाच्या गर्दीने फुललेल्या आठवडी बाजारावर अवकळा पसरली आहे .जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीकरिता गर्दी करणारे ग्राहक बाजारात दिसेनासे झाले असून विक्रेत्यांना ग्राहकाची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.