नागपूरच्या लॉकडाऊनच्या धसक्याने मुहूर्ताच्या एक दिवसापूर्वीच आटोपला विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST2021-03-15T04:26:42+5:302021-03-15T04:26:42+5:30
चंद्रपूर : लग्न म्हटलं तर मुहूर्त प्राधान्याने बघितला जातो. मुहूर्त नसेल तर चार-पाच महिनेही वाट पाहिली जाते. मात्र, कोरोना ...

नागपूरच्या लॉकडाऊनच्या धसक्याने मुहूर्ताच्या एक दिवसापूर्वीच आटोपला विवाह
चंद्रपूर : लग्न म्हटलं तर मुहूर्त प्राधान्याने बघितला जातो. मुहूर्त नसेल तर चार-पाच महिनेही वाट पाहिली जाते. मात्र, कोरोना संसर्गाने या सर्व पारंपरिक गोष्टींना बाजूला सारले आहे. एका वधू-वराचा नियोजित विवाह कोरोना संसर्गात प्रशासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे चक्क एक दिवस आधीच उरकण्यात आला.
या विवाहाची चर्चा चांगलीच शहरात रंगली. येथील पठाणपुरा प्रभागातील विठ्ठल मंदिर वाॅर्डात राहणाऱ्या सुरेश आंबटकर यांचा मुलगा हर्षल याचा विवाह रीतीरिवाजाप्रमाणे नागपूर येथील गंगाधर डायगव्हाणे यांची मुलगी रचना हिच्यासोबत जुळला. विवाहाची तारीख निश्चित झाली. १५ मार्च २०२१ रोजी दुपारी १२.२० मिनिटांनी मुहूर्त ठरला. नागपूर येथे वधूच्या शहरात हा विवाह होणार होता. मात्र, कोरोना संसर्गामुळे नागपूर जिल्हा प्रशासनाने व मनपा प्रशासनाने १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत कडक लाॅकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे आंबटकर व डायगव्हाणे कुटुंबातील हे लग्न १५ मार्चला करणे शक्य नव्हते. त्यामुळे वर-वधू पक्षांनी यावर तोडगा काढत नियोजित तारखेच्या एक दिवस आधीच म्हणजे १४ मार्चलाच विवाह उरकून टाकायचे ठरविले. त्यानंतर तात्काळ आप्तस्वकीय, मित्र परिवारांना भ्रमणध्वनी, सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाची नवी तारीख कळविण्यात आली आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून हर्षल आणि रचना यांचा विवाह पार पडला.