्रडीपी प्लॅनमधील मार्ग झाले संकुचित
By Admin | Updated: November 19, 2015 00:57 IST2015-11-19T00:57:55+5:302015-11-19T00:57:55+5:30
शहराचा व्याप आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी शहरासाठी केलेले नियोजन मात्र तोटके पडत आहे.

्रडीपी प्लॅनमधील मार्ग झाले संकुचित
अतिक्रणाने वेढले १६ मार्ग
गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूर
शहराचा व्याप आणि लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी शहरासाठी केलेले नियोजन मात्र तोटके पडत आहे. महानगर होण्याच्या मार्गावर असलेल्या चंद्रपुरातील वाढती लोकसंख्या, वाढती वाहने आणि दैनंदिन गरजांसाठी असलेली बाजारपेठ लक्षात घेता दळणवळणासाठी असलेले मार्ग अडचणीचे ठरत आहे. प्रत्यक्षात या मार्गांची रुंदी मोठी असली तरी मागील काही वर्षात मार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाढलेली अतिक्रमणे आणि त्यांना आलेले ‘कायम’पणाचे स्वरूपच अडचणीचे ठरत आहे.
पराकोटाच्या आत असलेल्या शहरातील नागरिकांच्या वहिवाटीसाठी महात्मा गांधी मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्ग हे दोन प्रमुख मार्ग असले तरी अनेक उपमार्गही तेवढेच महत्वाचे आहेत. या मार्गांच्या टाऊन प्लॅनिंगमध्ये नोंदी असल्या तरी प्रत्यक्षात मात्र या मार्गांकडे कुणीच गांभीर्याने लक्ष न दिल्याने अनेक मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून संकुचित झाले आहेत. असे एक नव्हे तर, १६ मार्ग महानगर पालिकेने आपल्या हिटलिस्टवर आणल्याने भविष्यात या मार्गांवरील अतिक्रमणे हटविणे गरजेचे झाले आहे.
प्रशासनाच्या अलिकडेच झालेल्या एका बैठकीत शहरातील या मार्गांवर वाढलेल्या अतिक्रमणाबद्दल गंभीर चर्चा करण्यात आली. शहरातील मार्ग डीपीच्या (विकास आराखडा) नकाशावर मोठे दिसत असले तरी आता ते मोठे राहिलेले नाहीत. यामुळे अस्तीत्वात असलेल्या मार्गांवरील अतिक्रमण दूर केले तर वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी दूर होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी भविष्यात ठोस उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी ही मुख्य समस्या आहे. ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. गेटला पाच मार्ग मिळत असल्याने या मार्गांवरील भार हलका करण्यासाठी उपाययोजना शोधल्या जात आहेत. यासाठी मनपाने अधोरेखित केलेल्या १६ मार्गांवरील अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने भविष्यात हालचाली करणे प्रशासनाला क्रमप्राप्त झाले आहे.