जंगलातील पाणवठे आटले
By Admin | Updated: March 13, 2016 01:08 IST2016-03-13T01:08:27+5:302016-03-13T01:08:27+5:30
जंगलातील कुत्रीम पाणवठे मार्च महिन्याच्या तप्त उष्णतेने आटायला लागले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी ...

जंगलातील पाणवठे आटले
वनविभागाचे दुर्लक्ष : पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती
मूल : जंगलातील कुत्रीम पाणवठे मार्च महिन्याच्या तप्त उष्णतेने आटायला लागले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी सतत वाढणारे तापमान बघता पाणवठे तग धरू शकणार नसल्याचे बोलले जात आहे.
वाढणाऱ्या तापमानामुळे वन्यप्राण्यांची भटकंती होण्याची दाट शक्यता असून त्यात शिकारीसुद्धा वन्यप्राण्यावर पाळत ठेवत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्ष राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
मूल तालुक्यात चार वनविभागाचा कारभार चालतो. यात ताडोबा अंधारी प्रकल्पातील बफर झोन परिक्षेत्र, चंद्रपूर वनविभागातील चिचपल्ली वनपरिक्षेत्र, वनविकास महामंडळ तसेच विशेष संरक्षण दलाचे कार्यालयसुद्धा याच तालुक्यात आहे. चार वनविभागाचा कारभार या तालुक्यात चालत असल्याने वनविभाग पाहिजे त्या प्रमाणात संवेदनशील नसल्याचे जाणवते. जंगलात काही प्रमाणात अवैध वृक्षतोड वनविभागाच्या डोळ्यात धूळ झोकून केली जाते. तसेच वन्यप्राण्यासाठी लाखो रुपये खर्च करून विविध योजना राबविल्या जातात, त्या योजना पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी होत नसल्याचे दिसून येते.
मागील वर्षी ज्या ठिकाणी विद्युत नाही अशा घनदाट जंगलात सौर उर्जेवर चालणारे हातपंप बसवून पाणवठ्यावर पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष लक्ष न घातल्याने त्याचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा होत नसल्याचे दिसून येते. वन्यप्राण्यासाठी वनदान ठरू पाहणाऱ्या विविध योजनांचा लाभ मूल बफर झोन, वनपरिक्षेत्र कार्यालय चिचपल्ली, वनविभाग महामंडळ व विशेष व्याघ्र संरक्षण दलानी लक्ष घातले तर वन्यप्राण्यांना संजीवनी मिळेल. (तालुका प्रतिनिधी)