पोंभुर्णा तालुक्यात जलजन्य आजार बळावले

By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:35+5:302015-07-25T01:14:35+5:30

तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींकडून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने जलजन्य आजार बळावत आहे

Waterborne illness has been formed in Pobhurna taluka | पोंभुर्णा तालुक्यात जलजन्य आजार बळावले

पोंभुर्णा तालुक्यात जलजन्य आजार बळावले

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : नळाद्वारे दूषित पिण्याचा पुरवठा
नीळकंठ नैताम  पोंभूर्णा
तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींकडून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने जलजन्य आजार बळावत आहे. त्यातून तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पोंभूर्णा येथील वॉर्ड क्रमांक चारमध्ये गेल्या एक महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेकांना जलजन्य व काविळासारख्या आजाराने पछाडले आहे. काही रुग्ण उपचारासाठी चंद्रपूर येथे जात आहेत. मात्र ग्रामपंचायतीचे पदाधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीकडे जलशुद्धीकरण यंत्र नसल्याने अनेक दिवसांपासून नागरिकांना दूषित पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. नदी-नाल्याकाठी असलेल्या विहीरीचे पाणी नळाद्वारे नागरिकांना दिल्या जाते. पावसाला सुरूवात झाल्यानंतर ते पाणी गढूळ व दूषित झाले आहे. या पाण्याचा पिण्यासाठी वापर केल्याने ग्रामस्थांना विविध जलजन्य आजाराला बळी जावे लागत आहे. पोंभूर्णा येथील ५० ते ६० नागरिकांना काविळ या आजाराने ग्रासले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. अनेक गावांतून बरेच रुग्ण पोंभूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असल्याने येथील आरोग्य केंद्र दिवसभर गर्दीने फुलून असते. उलटी होणे, डोके दुखणे, काविळ आदी जलजन्य आजारात वाढ होत असल्याचे चित्र तालुक्यात आहे.

फायलेरिया कर्मचाऱ्यांकडून फवारणीकडे दुर्लक्ष
गावातील घाण आणि डबके यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. त्यापासून आजाराची लागण झाल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो. यासाठी शासनाने काही गावाच्या मागे एक फायलेरिया कर्मचारी ठेवलेला आहे. गाव परिसरातील नाल्यातील डासांची पैदास नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. परंतु सदर फायलेरिया कर्मचारी गावामध्ये कधी फवारणी करताना दिसत नाहीत. ते वर्षभर कोणते काम करतात, हेदेखील एक कोडेच आहे. वरिष्ठांचेसुद्धा त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने ते काम न करता वेतन मात्र घेत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या निष्काळजीपणामुळे गावामध्ये डासाची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेकांना विविध आजार होत असल्याचे चित्र दरवर्षी पहायला मिळते.

फॉगिंग मशीन धूळ खात
पंचायत समितीस्तरावरून अनेक ग्रामपंचायतींना शासनामार्फत डासाच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फॉगिंग मशीन फवारणीसाठी दिल्या आहेत. परंतु त्या मशीनचा वापर कुठल्याच ग्रामपंचायतीमध्ये होत नसल्याचे दिसते. एखादा आजार किंवा साथीचे तिव्ररूप धारण करून कुणी मृत्यू झाल्यास संबंधित ग्रामपंचायती त्या मशीनचा वापर करण्यासाठी लक्ष केंद्रीत करीत असतात. आजारात वाढ झाल्याने ते नियंत्रणात आणणे मात्र मग कठीण झाले असते.

मुनगंटीवारांनी लक्ष घालावे
पोंभुर्णा तालुका परिसरातील क्षेत्रामधून सुधीर मुनगंटीवार सलग तिनदा निवडून आलेत. आज ते मंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. यापूर्वी त्यांनी सत्तेत आपला पक्ष आल्यास स्वच्छ प्रशासन देऊ, असे अनेकदा जाहीर सभांमधून सांगितले. विकासाकडे लक्ष देणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. म्हणूनच त्यांना वित्त मंत्र्याचा दर्जा सुद्धा मिळाला आहे. आता तर त्यांचेच सरकार सत्तेवर आहे. मग कुठे गेले स्वच्छ प्रशासन? असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील अनेक गावांत दूषित पाणी मिळते ही नित्याचीच बाब असून याकडे ना.मुनगंटीवारांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.

पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये दिवसेंदिवस जलजन्य आजारांत वाढ होत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी होत असल्याने जलजन्य आजारात वाढ होत आहे. अनेक रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी येत आहेत. आजाराची साथ आटोक्यात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभाग, पंचायत समिती, तहसील कार्यालय यांच्या मार्फत प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायतीअंतर्गत दिवंडी देऊन पाणी उकळून, गाळून पिण्याबाबतच्या सुचना स्थानिक नागरिकांना दिल्या जात आहेत.
- डॉ. विलास धनगे, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोंभूर्णा

Web Title: Waterborne illness has been formed in Pobhurna taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.