विरईत दहा दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प

By Admin | Updated: December 18, 2014 22:52 IST2014-12-18T22:52:27+5:302014-12-18T22:52:27+5:30

विरई येथे पाणी समस्या गंभीर असून पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत आहे. विरईत पाच वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ योजना कार्यान्वित केली होती.

Water supply jam for 10 days | विरईत दहा दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प

विरईत दहा दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प

भेजगाव : विरई येथे पाणी समस्या गंभीर असून पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत आहे. विरईत पाच वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ योजना कार्यान्वित केली होती. परंतु ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वीज देयक थकित राहिले. वीज देयकाच्या थकित रकमेमुळे वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा दहा दिवसांपूर्वीपासून बंद केला आहे. त्यामुळे विरईवासीयांचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून परिसरातील बोरचांदली व १९ गावांकरिता ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विरईत पाणी पुरवठा सुरू झाला. अन् विरईची जनता सुखावली. मात्र अल्पावधीतच या योजनेने रंग बदलविणे सुरू केले. त्यामुळे विरईत पाणी प्रश्न पेटला. या योजनेचे पाणी वाटपाचे काम कंत्राटारामार्फत चालत असल्याचे समजते. ठेकेदाराच्या कामचुकार व पैसे खाऊ धोरणामुळे विरईत चार दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो. परंतु तिथेही मुबलक पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य ठिकाणापासून विरई गाव अगदी जवळ आहे. विरईत जर अशी स्थिती असेल तर उर्वरित गावाची काय अवस्था असेल. गावातील नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व पाणी पुरवठा कंत्राटदारांना माहिती दिली. परंतु यांचा काहीही उपयोग झालेला नाही. अधिकारी व कंत्रादार आपण नियमित पाणी पुरवठा करत असल्याचा आव आणून मूग गिळून गप्प बसले आहेत.
गावातील हातपंपाची व विहिरीची पाण्याची पातळी खोल गेल्याने हातपंपाचे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे महिलांना रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हिवाळ्यातच ही स्थिती आहे तर पुढे उन्हाळ्यात परिस्थिती कशी असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे शासनाच्या पाणी पुरवठा विभाग व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाणी पुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Water supply jam for 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.