दहा दिवसांपासून पाच गावांचा पाणी पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST2021-01-23T04:28:51+5:302021-01-23T04:28:51+5:30
वढोली : गोंडपिपरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सकमूर गावात चेकनांदगाव पाणी पुरवठा योजनेची पाण्याची टाकी आहे. चेकनांदगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ...

दहा दिवसांपासून पाच गावांचा पाणी पुरवठा बंद
वढोली : गोंडपिपरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सकमूर गावात चेकनांदगाव पाणी पुरवठा योजनेची पाण्याची टाकी आहे. चेकनांदगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सात गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे मागील दहा दिवसांपासून पाच गावांना पाणी पुरवठा बंद आहे.
कुडेनांदगाव, चेकनांदगाव, हेटीनांदगाव, टोलेनांदगाव, गुजरी, सकमूर या गावांना या योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे योजना अयशस्वी ठरत आहे. पाणी पुरवठा खंडित झाल्यास पाचही गावात पाण्याचे इतर कोणतेही स्रोत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्यामुळे तेथील पुरुषांना व महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यातील पाणी आणण्यास पायी किंवा बैलबंडीने जावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.