जलयुक्त शिवारची गती मंदावली
By Admin | Updated: June 8, 2015 01:45 IST2015-06-08T01:45:27+5:302015-06-08T01:45:27+5:30
वरुणराजाच्या अवकृपेमुळे २०१४-१५ या वर्षांत कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट जिल्ह्यावर ओढावले.

जलयुक्त शिवारची गती मंदावली
केवळ ३४० कामे पूर्ण : अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव
चंद्रपूर : वरुणराजाच्या अवकृपेमुळे २०१४-१५ या वर्षांत कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट जिल्ह्यावर ओढावले. मान्सून कालावधीत कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्याची भूजल पातळी घटली. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर मात करण्यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून जलयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जिल्ह्यात झालेल्या कामांची स्थिती पाहता योजनेची कामे मंदावल्याचे दिसून येते.
जलयुक्त शिवार अभियानार्तंगत जिल्ह्यातील १५ तालुक्यातील २१८ गावांची निवड करण्यात आली. मात्र यातील केवळ १६५ गावांमध्येच प्रत्यक्ष कामांना सुरूवात करण्यात आली आहे. या गावांत ५६० कामे प्रस्तावित असून यातील केवळ ३४० कामे पूर्ण झाल्याचे दिसून येत आहेत.
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी निरीक्षण विहिरींची पाणी पातळी मोजली जाते. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर संभाव्य पाणीटंचाई आराखडे तयार करण्याकरिता तसेच संभाव्य टंचाई परिस्थितीचे आकलन करण्याकरिता तालुकानिहाय व पाणलोट क्षेत्रनिहाय निरीक्षण विहिरीतील मान्सूनोत्तर भूजल स्थिर पातळीचा आढावा घेण्यात येतो. या आकलनात डिसेंबर महिन्यात राज्यातील तब्बल १९० तालुक्यांची भूजल पातळी तीन मीटरने घटल्याचे समोर आले.
तर १८४ तालुक्यात २० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीपातळी घटली. तसेच १८८ तालुुक्यात भूगर्भातील पाणीपातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत दिले होते.
याची दखल घेत राज्य शासनाने दरवर्षी निर्माण होणारी पाणी टंचाई यावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार भेट अभियान सुरू करण्याचे आखले. भूजल पातळीत झालेली घट व उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई यावर मात करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
तसेच जुन्या जलसंरचनाचे पुर्नजिवन करणे, पाझर तलाव, लघु सिंचन तलाव दुरूस्ती व नुतणीकरण करून पाणी साठवणूक क्षमता वाढविणे, छोटे ओढे व नाल्यांची जोडणी करणे, कालव्याची स्वच्छता करणे, विहिर बोअरवेल पुनर्भरण, अस्तीत्वात असलेल्या लघु पाटबंधाऱ्याच्या कामाला गती देणे आदी कामे प्राधान्याने होणे गरजेचे असताना प्रशासनाने याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याने कामांची गती मंदावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्हास्तरीय निधीतून कामे
अभियानाच्या माध्यमातून कृषी, लघुसिंचन, जलसंपदा व जिल्हा परिषदेच्या वतीने गाव तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, सिमेंट क्रॉक्रीट बंधारे बांधकाम, जुन्या जलसंरचनाचे पुनर्जीवन, जोड प्रकल्प राबविणे, कालवा दुरुस्ती, वृक्ष लागवड, तलावातील गाळ काढणे, मोठ्या व मध्यम प्रकल्पाची उपयोगीता वाढविणे आदी कामे करण्यात येत आहेत. ही कामे जिल्हास्तरावर उपलब्ध होणाऱ्या निधीतून होणार असून या कामांचे मूल्यमापनही शासनाकडून करण्यात येणार आहे. मात्र अधिकाऱ्यांचेच कामांकडे दुर्लक्ष होताना कामाच्या स्थितीवरून दिसून येते.
सिंचनालाही लागणार होता हातभार
जिल्ह्यातील शेतीक्षेत्र मोठ्या प्रमाणात कोरडवाहू स्वरूपाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच शेती व्यवसाय करावा लागतो. शेतकऱ्यांना अस्मानी संकटातून सावरण्यासाठी व निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान महत्त्वाची भूमिका पार पाडणार होते. मात्र अनेक कामे पावसाळ्यापूर्वी अपूर्ण अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना पून्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागण्याची चिन्ह दिसू लागली आहे.