उन्हाच्या तडाख्यात पाणी टंचाईची झळ

By Admin | Updated: May 27, 2014 23:35 IST2014-05-27T23:35:05+5:302014-05-27T23:35:05+5:30

वैशाख वणव्याचे चटके बसत आहे. परिसरात गेल्या काही वर्षांपासून काँक्रीटचे जंगल वाढू लागल्याने तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हाळ्याला आणखी एक महिना शिल्लक आहे.

Water scarcity in summer crackdown | उन्हाच्या तडाख्यात पाणी टंचाईची झळ

उन्हाच्या तडाख्यात पाणी टंचाईची झळ

शंकर चव्हाण - जिवती

वैशाख वणव्याचे चटके बसत आहे. परिसरात गेल्या काही वर्षांपासून काँक्रीटचे जंगल वाढू लागल्याने तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हाळ्याला आणखी एक महिना शिल्लक आहे. त्यात उष्म्याचा तडाखा आणी पाणी टंचाईची झळ आता पहाडावरील नागरिकांना सोसवेना झाली आहे.

माणिकगड पहाडावरील भुरीयेसापूर, टाटाकोहाड, खडकी, रायपूर, नानकपठार, मारोतीगुडा, सेवादासनगर, मुकादमगुडा, परमडोली, इंदिरानगर, अंतापूर, जोडणघाट, शंकरपठार, मच्छीगुडा, येरवा, चलपतगुडा, घाटराईगुडा, धाबा, घोडणकप्पी, वणी (बु.), गोंदापूर, मराईपाटण, राहपल्ली (खु.) आदी गावात वर्षानुवर्षे पाणी टंचाईची झळ पोहचत असून शासकीयस्तरावरील होणारे प्रयत्न मात्र अपुरे ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. येथील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे, यासाठी शासनाने जलस्वराज्य प्रकल्प, महाजल प्रकल्प, शिवकालीन योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजना अशा विविध महत्त्वाकांक्षी योजना गावात राबवूनही पाणी टंचाई का निर्माण होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वर्षानुवर्षे निसर्गाचे झटके सहन करणार्‍या नागरिकांना आता पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. दिवसभर शेतात रोजी रोटीसाठी काम करणे आणि सकाळ-सायंकाळ पिण्याच्या पाण्यासाठी भटकणे ही येथील नागरिकांची दिनचर्याच झाली आहे. ही तर पिण्याच्या पाण्याची रडकथा आहे. आंघोळीच्या आणी कपडे धुण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी होणारे हाल यापेक्षाही बिकट आहेत. दोन ते तीन किलोमीटरचा पल्ला गाठून महिलांना कपडे धुवावे लागतात. केवळ प्रशासनाच्या उदासिनतेमुळे येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून पाण्याची गरज भागवावी लागत आहे. पंचायत समितीतील पाणी पुरवठा विभागाला वारंवार तक्रारी करूनही या महत्त्वाच्या बाबीवर कुठल्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याचा आरोप पहाडावरील नागरिकांकडून केला जात आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला तलाव कोरडा

पहाडावरील नागरिकांना सिंचनाची सोय व्हावी. पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाणी टंचाईचे निर्मूलन होईल, या उद्देशाने लघुपाटबंधारे विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला तलाव परिसरातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरला होता. पाण्याच्या पातळीतही वाढ झाली होती. मात्र अधिकार्‍यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे तुडूंब भरलेला तलाव कोरडा झाला आहे.

सेवादासनगरात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट

आंध्र-महाराष्ट्र सिमेलगत असलेल्या सेवादासनगर गावात गेल्या फेब्रुवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. अनेकवेळा प्रशासनाला याबाबत कळवूनही ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही. गावालगत असलेल्या विहिरीतील पाणी आटले आहे.

खडकीतील जलस्वराज्य

प्रकल्प ठरले कुचकामी

जंगलाच्या पायथ्याशी वास्तव्यास असलेल्या खडकी या गावातील आदिवासी कोलाम बांधव अजुनही मुलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहे. शुद्व व स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे, यासाठी शासनाने गावात जलस्वराज्य प्रकल्प राबविला. त्यात विहीर खोदकाम व बांधकाम करण्यात आले. कंत्राटदाराने विहिरीचे बांधकाम करताना काळी रेती व सिमेंटचा कमी प्रमाणात वापर केल्याने बांधकाम केलेल्या विहिरीला एका वर्षातच तडे गेले.

दूषित पाण्यावर भागवितात तहानदारिद्रय़रेषेखाली जीवन जगणार्‍या मच्छी समाजातील वस्तीला शिक्षण, आरोग्य, वीज घरकुलाच्या समस्यांबरोबरच पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. शासनाने या गावातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी कोणतीच कायमस्वरुपीे योजना राबविली नाही.

Web Title: Water scarcity in summer crackdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.