झिरे खोदून प्यावे लागते पाणी !
By Admin | Updated: May 10, 2014 00:04 IST2014-05-10T00:04:25+5:302014-05-10T00:04:25+5:30
मागील तीन महिन्यापासून कोंढाना गावात पाणी पुरवठा बंद आहे. त्यात पिण्याच्या पाण्याचे एकमेव स्रोत असलेल्या विहिरीचा उपसा करण्यात आलेला नाही.

झिरे खोदून प्यावे लागते पाणी !
दिलीप बच्चुवार - धाबा
मागील तीन महिन्यापासून कोंढाना गावात पाणी पुरवठा बंद आहे. त्यात पिण्याच्या पाण्याचे एकमेव स्रोत असलेल्या विहिरीचा उपसा करण्यात आलेला नाही. त्यामुळे गावात भिषण पाणी टंचाई सुरू आहे. तहान भागविण्यासाठी नागरिकांना चक्क झिरे खोदून पाणी काढावे लागत आहे. हे करतानाही दोन किमीची पायपीट नशिबी आली आहे. पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत कोंढाणा गाव येते. धाबा ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या या गावात पूर्वीपासूनच पाण्याची भिषण समस्या आहे. गावात पाण्याचे स्रोत नाहीत. अनेक वेळा विहिरी खोदण्यात आल्या. बोअरवेल मारण्यात आली. मात्र पाण्याचा पत्ता नाही. त्यामुळे गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या नाल्यातील पाणी घेऊन नागरिक आपली तहान भागवितात. धाबा, गोजोली पाणी पुरवठा योजनेत या गावाचा समावेश झाल्यावर येथील पाणी प्रश्न सुटला. मात्र तीन महिन्यापूर्वी या गावाच्या पाईपलाईनला मंगलपेठची पाईपलाईन जोडण्यात आली. कोंढाणा गाव टेकडावर वसलेले असल्याने या गावात पाणी पुरवठा होणे बंद झाले. थोळेफार पाणी नळाला येते मात्र या पाण्याने एक, दोनच मडके भरली जातात. त्यामुळे गावात पाण्यासाठी हाहा:कार सुरू आहे. नाल्यात असलेल्या विहिरीचा उपसा मागील दोन वर्षापासून करण्यात आलेला नाही. नाल्यालाही सध्या पाणी नाही. त्यामुळे नागरिकांना आता नाल्यात ठिकठिकाणी झिरे खोदून पाणी काढावे लागत आहे. हेच पाणी प्यायलाही वापरले जात आहे. पहाटेपासूनच नागरिक नाल्याकाठी जमा होतात. प्रत्येक झिर्यावर मडक्याच्या रांगा असतात. एक मडके भरण्यासाठी किमान अर्धा तास लागत असतो. रखरखत्या उन्हातही गावकरी पाणी भरण्यासाठी गुंतले असतात. दिवसा पाणी मिळाले नाही तर सायंकाळी अंधारात झिर्यातील पाणी काढावे लागते. नाल्यात असलेल्या विहिरीचा उपसा करण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केली. मात्र या मागणीकडे ग्रामपंचायतीने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. पाण्यासाठी दाहीदिशा भटकणार्या या गावात स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर आहे. चार वर्षापासून येथील नाल्यांचा उपसा झालेला नाही. गावात सर्वत्र घाण साचलेली आहे. पाणी प्रश्न त्वरित सोडवा, अशी आर्त मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)