कोळसा खाणींनी घटतेय पाण्याची पातळी

By Admin | Updated: June 8, 2015 01:54 IST2015-06-08T01:54:44+5:302015-06-08T01:54:44+5:30

राजुरा तालुक्याला कोळसा खाणींचे वरदान असले तरी कोळसा उत्खननासाठी वेकोलित मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या प्रचंड उपशामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

Water level decreasing by coal mines | कोळसा खाणींनी घटतेय पाण्याची पातळी

कोळसा खाणींनी घटतेय पाण्याची पातळी

प्रकाश काळे  गोवरी
राजुरा तालुक्याला कोळसा खाणींचे वरदान असले तरी कोळसा उत्खननासाठी वेकोलित मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या प्रचंड उपशामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. परिणामी भविष्यात वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे राजुरा तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट घोंगावत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणी बोअरवेलपेक्षा २०० ते ३०० फुट अधिक खोल असल्याने पाण्याची पातळी खोल गेली आहे. तालुक्यात गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणी विस्तारल्या आहेत. वेकोलिने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बदलल्याने थोड्याफार पावसाने वेकोलि परिसरातील गावात पूर परिस्थिती निर्माण होते. वेकोलिची गोवरी नं. १ कोळसा खाण गोवरी गावाला अगदी लागून आहे. वेकोलिने गोवरी गावालागत असलेल्या नैसर्गिक नाल्यावर मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहेत. मात्र ते टाकताना दुष्परिणामांचा विचार वेकोलि प्रशासनाने केला नाही. वेकोलि परिसरातील नाले, नदी, उन्हाळ्यापूर्वीच आटत असल्याने जनावरांना पाणी मिळणे कठीण होते. शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. परंतु वेकोलिच्या कोळसा खाणी खासगी बोअरवेल पेक्षाही अधिक खोल असल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे.
कोळसा खाणीतील पाण्याच्या प्रचंड उपसामुळे दिवसेंदिवस राजुरा तालुक्यातील गावांत पाणी टंचाई उग्ररूप धारण करीत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दिवसरात्रं भटकंती करावी लागते. मात्र वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे होणाऱ्या या दुष्परीणामांचे भोग परिसरातील जनतेला भोगावे लागतात. परंतु अनेकदा गावकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी वेकोलि प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मात्र वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. कोळसा खाणीतून उडणाऱ्या धुळीने शेतातील पीक पूर्णत: काळवंडते.
वेकोलि परिसरातील रस्ते धुळीने माखले असून त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार बळावण्याची भीती असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र वेकोलि प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने कोळसा खाणींचे दुष्परिणाम जनतेला भोगावे लागत आहे. मात्र यावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत.

Web Title: Water level decreasing by coal mines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.