चंद्रपूरकरांवर पाण्याचे दुर्भिक्ष

By Admin | Updated: July 26, 2015 01:27 IST2015-07-26T01:27:10+5:302015-07-26T01:27:10+5:30

चंद्रपूरकरांना समस्यांशी दोन हात करणे जणू पाचवीलाच पूजले आहे. एका पाठोपाठ एक असे समस्यांचे डोंगर पार करीत येथील नागरिकांना आयुष्य पुढे रेटावे लागत आहे.

Water famine on Chandrapurkar | चंद्रपूरकरांवर पाण्याचे दुर्भिक्ष

चंद्रपूरकरांवर पाण्याचे दुर्भिक्ष

पाच सिंचन प्रकल्पात ठणठणाट : इरई धरणात केवळ ४४ टक्के पाणी
रवी जवळे चंद्रपूर
चंद्रपूरकरांना समस्यांशी दोन हात करणे जणू पाचवीलाच पूजले आहे. एका पाठोपाठ एक असे समस्यांचे डोंगर पार करीत येथील नागरिकांना आयुष्य पुढे रेटावे लागत आहे. रस्ते, घाणीचा विळखा, बॅक वॉटर या समस्यांचा निपटारा होत नाही तोच आता नव्या संकटाची चाहूल लागत आहे. यंदा पावसाने नव्हे तर पावसाळ्यानेच हुलकावणी दिल्याने चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. १६०.२४५ मीटर क्षमता असलेल्या या धरणात सध्या पावसाळ्यातच केवळ ७१.६४९ मीटर एवढे पाणी आहे. याची टक्केवारी केवळ ४४.७१ आहे. त्यामुळे पुढे पाऊस बरसला नाही तर चंद्रपूरकरांवर पाण्याचे मोठे दुर्भिक्ष ओढविणार आहे.
चंद्रपूरकर मागील दहा वर्षांपासून एक ना अनेक समस्यांपासून त्रस्त आहेत. रस्ते, नाल्या, तप्त उन्हाळा, प्रदूषण, घाणीचा विळखा यासारख्या समस्या चंद्रपूरकरांच्या पाचवीलाच पूजल्या आहेत. अलिकडच्या काही महिन्यात यातील काही समस्यांचा निपटारा महानगरपालिकेकडून केला जात असला तरी दुसरी समस्या आ वासून उभीच राहते.
सध्या चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने चांगलेच त्रस्त करुन सोडले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या आटोपल्या. मात्र प्रारंभी तीन दिवस संततधार स्वरुपात बरसणारा पाऊस अचानक दृष्ट लागावा, असा गायब झाला आहे. तो पुन्हा त्याच लयीने अद्यापही परतला नाही. संपूर्ण जिल्ह्याची पावसाची आकडेवारी बघितली तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४५८.४२ मिमी पाऊस पडला आहे. पावसाळ्यातील जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११३५.४०६ मिमी आहे, हे येथे उल्लेखनीय.
जुलै महिना हा खरा पावसाचा महिना समजला जातो. मात्र यंदा जुलै महिना संपत आला असतानाही पावसाचे रंग काही बरे दिसत नाही. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस बरसत नसल्यामुळे हळूहळू पाण्याचे मोठे संकट निर्माण होत आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचीही स्थिती काही चांगली नाही. ११ सिंचन प्रकल्पापैकी असोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चारगाव आणि लभानसराड या पाच प्रकल्पात पावसाळा सुरू असताना पाण्याचा ठणठणाट आहे. या अत्यल्प पावसाचा खरीप हंगामाला म्हणजेच शेतकऱ्यांना तर फटका बसणार आहेच; पण सर्वसामान्य नागरिकांना, उद्योगांनाही पुढे मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.
चंद्रपूरकरांना इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. म्हणजेच साडेचार लाख लोकांची तहान सध्या इरई धरणच भागवित आहे. मात्र या धरणाची सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. १६०.२४५ मीटर क्षमता असलेल्या या धरणात सध्या पावसाळ्यातच केवळ ७१.६४९ मीटर एवढे पाणी आहे. मागील वर्षी जुलैअखेर या धरणात ८४.८७० मीटर एवढे पाणी होते. मात्र आता ते केवळ ४४.७१ टक्के आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षी आॅगस्टमध्ये आणि पुढेही अधेमधे चांगला पाऊस आल्याने धरणाची स्थिती मजबुत झाली होती. आता पावसाची हुलकावणी अशीच कायम राहिली तर पुढे हिवाळा आणि त्या पाठोपाठ येणारा उन्हाळा चंद्रपूरकरांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळविणार आहे.
वीज निर्मितीवरही परिणाम
इरई धरण चंद्रपूर शहराची तहान भागविते. तसेच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातही वीज निर्मितीसाठी या धरणातून पाणी वापरले जाते. धरणात केवळ ४४ टक्के जलसाठा असल्याने महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीही प्रभावित झाली आहे. दोन हजार ३४० मेगावॅट क्षमतेच्या या केंद्रातून सध्या बाराशे ते तेराशे मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. पाऊस समाधानकारक पडला नाही तर वीज निर्मितीवर विपरित परिणाम होणार आहे.
तेव्हा माना खाणीचा होता पर्याय
२०११-१२ मध्ये अशी परिस्थिती चंद्रपूरकरांवर ओढविली होती. त्यावेळीही पावसाळ्याने दगा दिल्याने इरई धरणात अत्यल्प जलसाठा होता. त्यावेळी जिल्हा प्रशासनानेही एक चुक केली होती. धरणात पाणी असताना गरज नसतानाही धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला होता. त्यावेळी चंद्रपूरकरांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. दोन दिवसाआड नळातून पाणी पुरवठा व्हायचा. त्यावेळी माना खाणीतील पाणी शुध्दीकरण करून चंद्रपूर शहरात पुरवठा करण्याचे काही सामाजिक संघटनांनी सूचविले होते. प्रशासनासोबत याबाबत चर्चाही झाली होती.

Web Title: Water famine on Chandrapurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.