पाणी व मातीचे संधारण हा महत्त्वाचा घटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:44 IST2019-07-03T22:44:41+5:302019-07-03T22:44:55+5:30
२०१५ साली महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना शासनाच्या विविध विभागामार्फत राबविली जात आहे. पाण्याचे व मृदेचे व्यवस्थापन हा यात मुख्य घटक आहेत. जिल्ह्यात १३०० मिमी पाऊस पडत असूनही काही गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे.

पाणी व मातीचे संधारण हा महत्त्वाचा घटक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २०१५ साली महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना शासनाच्या विविध विभागामार्फत राबविली जात आहे. पाण्याचे व मृदेचे व्यवस्थापन हा यात मुख्य घटक आहेत. जिल्ह्यात १३०० मिमी पाऊस पडत असूनही काही गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन कायमची उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करीत असून यापुढेही सहकार्य करीत राहील, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
२०१५ यावर्षीपासून सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजने अंतर्गत झालेल्या कार्याचे हस्तांतरण तसेच लोकसहभागाने जलसंधारणाच्या कामाची देखभाल तसेच दुरुस्ती या विषयावर आज बुधवारी प्रशिक्षण पार पडले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी वन प्रशिक्षण अकादमीच्या उपसंचालिका भिंगे, मृदा व जलसंधारण संस्था वाल्मी औरंगाबाद येथील सामाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र पुराणिक, प्राध्यापक किशोर राठोड, सहाय्यक प्राध्यापक मोहन नारखेडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अशोक बोकाडे, कार्यकारी अभियंता श्याम काळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक विजयता सोळंकी, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. पिपरे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जलसंधारणाच्या तांत्रिक बाबी या विषयावर वरिष्ठ भूवैज्ञानिक विजयता सोळंकी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.