प्लास्टिक बाॅटल्सचा कचरा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST2021-03-23T04:29:50+5:302021-03-23T04:29:50+5:30
रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर मार्गावरील जनता काॅलेज चौक ते वडगावपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले असून, सध्या ...

प्लास्टिक बाॅटल्सचा कचरा वाढला
रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर मार्गावरील जनता काॅलेज चौक ते वडगावपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले असून, सध्या डांबरीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून ठेवल्यामुळे रस्ता जैसे थेच दिसत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण हटवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
रेती तस्करांवर आळा घालावा
चंद्रपूर: शहरातील इरई नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी केली जात आहे. यावर आळा घालून पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, ट्रॅक्टर तसेच अन्य वाहनांद्वारे दिवसाढवळ्या रेती तस्करी केली जात आहे.
गंजवाॅर्डातील रस्त्याचे काम गतीने करावे
चंद्रपूर : येथील भाजीबाजार असलेल्या गंजवाॅर्डातील रस्त्याचे सिमेंटीकरण केले जात आहे. मात्र काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
हाॅटेलमध्ये पाण्याची विक्री
चंद्रपूर : शहरातील बहुतांश हाॅटेलमध्ये ग्राहकांना पाणीच दिले जात नाही. याउलट त्यांना बाॅटलचे विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे या हाॅटेल व्यावसायिकांवर अन्न औषध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
रंगकाम कामगारांचे नुकसान
चंद्रपूर : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील वर्षी लाॅकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेकांचा रोजगार गेला. त्यामुळे आर्थिक ताण पडला आहे. परिणामी, बहुतांश नागरिकांनी घराला रंग लावण्याचे काम पुढे ढकलले आहे. त्यामुळे रंगकाम करणाऱ्या कारागीरांच्या हाताला कामच नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
उड्डाणपूल सुरू करा
चंद्रपूर : वाहतूक पोलीस कार्यालयाकडून वरोरा नाका चौकाकडे येणाऱ्या पुलाला डाॅ. आंबेडकर काॅलेजकडे वळविण्यात आले आहे. या पुलाचे काम पूर्ण झाले असतानाही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे सदर पूल रहदारीसाठी खुला करावा, अशी मागणी केली जात आहे.
चहाच्या दुकानात गर्दी वाढतेय
चंद्रपूर: मागील काही दिवसापासून चंद्रपूर शहरातील विविध चौकांमध्ये चहाचे मोठमोठे
स्टाॅल लागले आहेत. यामध्ये नागरिक चहा पिण्यासाठी गर्दी करीत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
समाजमंदिर दुर्लक्षित
चंद्रपूर : शहरातील काही भागामध्ये समाजमंदिर बांधण्यात आले आहेत. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाल्यामुळे सध्या येथे केरकचरा साचला आहे. त्यामुळे समाजमंदिराला महापालिकेने आपल्या अधिनस्त घेऊन विकास करावा, अशी मागणी केली जात आहे.
वीज बिलामुळे ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : लाॅकडाऊनमध्ये अनेक ग्राहकांनी वीज बिल थकविले होते. दरम्यान, आता बिल भरण्यासंदर्भात महावितरणकडून वारावंर सूचना केल्या जात आहेत. त्यामुळे बिल भरणे ग्राहकांना कठीण जात आहे. विशेष म्हणजे, राजकीय नेत्यांनी आश्वासन दिल्यामुळे अनेकांना बिल थकविल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू
चंद्रपूर: जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनसारखी स्थिती आहे. असे असले तरी काही व्यावसायिक रात्री उशिरापर्यंत आपले व्यावसाय सुरू ठेवत आहेत. विशेष म्हणजे, गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसून मास्क, सॅनिटायझरसुद्धा वापरताना दिसत नाही. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
शौचालयाअभावी नागरिकांना त्रास
चंद्रपूर : येथील संत कवरराम चौक तसेच सिंधी काॅलनी परिसरात एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने येथील व्यावसायिक तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने येथे सार्वजनिक शौचालय उभारावे, अशी मागणी केली जात आहे.
फायबर गतिरोधक बदलावे
चंद्रपूर : येथील हुतात्मा स्मारकाजवळील रस्त्यावर फायबर गतिरोधक लावण्यात आले आहे. मात्र यातील काही तुटले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथे नव्याने फायबर गतिरोधक बसवावे, अशी मागणी केली जात आहे.
दिशादर्शक बोर्ड तुटला
चंद्रपूर : लाखो रुपये खर्चून चंद्रपूर शहरातील विविध रस्त्यावर मोठमोठे दिशादर्शक, गाव तसेच अंतर असलेले बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र यातील अनेक बोर्ड तुटले असून यामुळे बाहेरील नागरिकांना चुकीचा संदेश जात आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.