वर्धा नदी पट्ट्यातील शेती सिंचनापासून वंचित
By Admin | Updated: December 7, 2014 22:49 IST2014-12-07T22:49:15+5:302014-12-07T22:49:15+5:30
राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्ट्यात येणाऱ्या गावात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने मोटार पंप चालत नसून विहिरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असूनही शेती सिंचनापासून

वर्धा नदी पट्ट्यातील शेती सिंचनापासून वंचित
चंद्रपूर : राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्ट्यात येणाऱ्या गावात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने मोटार पंप चालत नसून विहिरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असूनही शेती सिंचनापासून वंचित राहत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे.
वर्धा नदी पट्ट्यातील कोलगाव, कढोली बु. मानोली, बाबापूर, चार्ली, निर्ली, धिडशी, पेल्लोरा, मार्डा, कुर्ली, किनबोडी, वरोडा, नांदगाव सूर्याचा, साखरी वाघोबा, पोवनी, माथरा, गोवरी, कोराडी, निमनी, चिंचोली, कवठाळा, जैतापूर, अंतरगाव, गोयगाव आदी गावातील शेतजमीन सुपिक आहे. कापूस, मिरची, सोयाबिन, गहू, चणा आदी या भागातील प्रमुख पीक आहेत. येथील कास्तकारांनी आपले शेतात मोठी गुंतवणूक करुन बोअरवेल आणि विहीरीचे बांधकाम केले. मात्र मुबलक पाणी असताना देखील कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे मोटारपंप जळत आहेत. परिणामी पिकांना पाण्याची गरज असतानाही ते देता येत नसल्यामुळे पीक डोळ्यादेखत करपत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
या परिसराला विरुर स्टेशन येथील सबस्टेशनमधुन विद्युत पुरवठा होतो. गोवरी येथे याचे फिडर आहे. मात्र लोड वाढल्यामुळे कमी व्होल्टेजचा वीजपुरवठा होतो अथवा वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यामुळे नव्या सब स्टेशनच्या प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र जागा उपलब्ध न झाल्यामुळे मंजुरी मिळाली नसल्याचे कंपनीचे अधिकारी सांगतात. वास्तविक वरोडा, निर्ली आणि साखरी येथे शासकीय जमीन उपलब्ध असून वीज वितरण कंपनीने हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा, अशी मागणी उमाकांत धांडे यांनी केली आहे.
लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या परिसरातील कास्तकारांचे अडचणींचा विचार करुन संवेदनशिलता दाखवित हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी उमाकांत धांडे, लक्ष्मणराव एकरे, विनोद झाडे, रामदास पाटील उपरे, रमेश पाटील झाडे, बळीराम वैद्य, दीपक पानघाटे, रतन वैद्य, मंगेश भोयर, किशोर ढुमणे, सुरेश पोडे, घटे, उत्तम बोबडे, अरुण उरकुडे, नत्थू पाटील बोबडे, लहू पाटील भोयर, कवडू कौरासे, कवडू गोरे, रवींद्र चटके, सुरेश वराटे, सुभाष गानफाडे, पुंडलिक ताजणे, गजानन एकरे, हेमराज जेनेकर, गणपत हिंगाणे, दीपक पाचभाई, श्रावण मालेकर, नीळकंठ दुबे, संजय उमरे, सुनील वनकर, नंदकिशोर कौरासे, मारोती क्षीरसागर, संजय गोरे, सुरेश ढुमणे आणि परिसरातील कास्तकारांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)