वेकोलिचे ओव्हरबर्डन उभेच
By Admin | Updated: June 7, 2014 23:50 IST2014-06-07T23:50:25+5:302014-06-07T23:50:25+5:30
मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे. वेकोलिने आपल्या प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी करून टाकले आहे.

वेकोलिचे ओव्हरबर्डन उभेच
पुराची भीती कायम : जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला खो
चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे. वेकोलिने आपल्या प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी करून टाकले आहे. चंद्रपूरलगत वेकोलिने भलेमोठे ओव्हरबर्डन केले आहे. मागील वर्षी पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चंद्रपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकार्यांमार्फत वेकोलिला ओव्हरबर्डन तत्काळ हटविण्याचे निर्देश दिले होते. मात्र पावसाळा तोंडावर आला असतानाही वेकोलिचे ओव्हरबर्डन उभेच आहे.
चंद्रपूरलगत असलेल्या माना खाण परिसरात व इरई नदीपात्रालगत वेकोलिने मातीचे मोठमोठे ढिगारे तयार केले आहे. वर्षांनुवर्षापासून याच ठिकाणी माती टाकण्यात येत असल्यामुळे हे ओव्हरबर्डन महाकाय झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे इरई नदीचे नैसर्गिक पात्र बदलत चालले आहे. परिणामी पावसाळ्यात चंद्रपूरकरांना नेहमीच बॅकवॉटरचा सामना करावा लागतो व पूरपरिस्थिती निर्माण होते. ४0 टक्के चंद्रपूरकरांना याचा दरवर्षी फटका बसतो. मागील वर्षी चंद्रपुरात तीन वेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चंद्रपूरचा दौरा करीत पुराची पाहणी केली होती. यावेळी काहींनी पुराला वेकोलिचे ओव्हरबर्डनही कारणीभूत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले होते. त्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकार्यांमार्फत वेकोलिला सदर ओव्हरबर्डन तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही वेकोलिने या संदर्भात कुठलेही पाऊल उचलले नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांनी ३१ मार्च २0१४ रोजी एक तातडीची बैठक घेऊन ओव्हरबर्डन हटविणे व संरक्षक भिंत बांधणे यावर चर्चा केली. वेकोलिला ओव्हरबर्डन हटविण्यासाठी ३१ मे २0१४ ही अंतिम तारीख देण्यात आली होतीे.
उल्लेखनीय असे की, निरीच्या चमूनेही चंद्रपूरच्या प्रदूषणाची पाहणी केली असता त्यांनीही वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे पूरपरिस्थिती व प्रदूषण होत असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वेकोलिला नोटीस देऊन सदर ढिगारे ४५ मीटरपर्यंत हटविण्यास सांगितले होते. जिल्ह्यात केवळ मुंगोली, बल्लारपूर व पद्मापूर येथेच नदीचा गाळ काढून ढिगारे हटविण्याचा अल्पसा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. परंतु चंद्रपुरात पुरासाठी कारणीभूत असलेले माना खाणीमुळे निर्माण झालेले ढिगारे अद्याप हटविण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. संरक्षण भिंत बांधण्याऐवजी मातीच्या पिशव्यांची भिंत घालण्यात येत असल्याची माहिती ग्रीन प्लॅनेटचे सुरेश चोपणे यांनी लोकमतशी बोलताना दिली. (शहर प्रतिनिधी)