विठोबाने घेतला गाडगेबाबांचा वसा
By Admin | Updated: February 23, 2015 01:20 IST2015-02-23T01:20:38+5:302015-02-23T01:20:38+5:30
शासन विविध योजनेच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र या योजना कागदावरच दिसत आहेत.

विठोबाने घेतला गाडगेबाबांचा वसा
अमोद गौरकार चिमूर
शासन विविध योजनेच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र या योजना कागदावरच दिसत आहेत. मात्र गाडगेबाबाचा वसा घेऊन प्रत्यक्ष कृती करीत ग्राम स्वच्छतेचे धडे जनतेला पटवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कवडसी (देश) येथील विठोबा हरी वैद्य करीत आहेत.
शंकरपूरपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले कवडसी (देश) हे एक हजार लोकवस्तीचे गाव. याच गावातील रहिवासी असलेले विठोबा वैद्य. आज त्याचे वय ५५ वर्ष आहे. या वयातही गावोगावी फिरुन प्रत्यक्ष कृतीतून ते ग्रामस्वच्छतेचे धडे लोकांना देत आहेत. गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांचा वसा चालविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. दररोज पूर्ण गाव स्वच्छ करणे, गावातील सर्व रस्त्यावर पहाटे पाणी शिंपणे, विठ्ठल मंंदिरात पूजा करणे व सायंकाळी भजन व कीर्तन करणे हा त्याच नित्यक्रम आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे दुर्गंधी पसरली होती आणि त्यातून रोगराई पसरत होती. ते आपणाला राष्ट्रसंतांच्या भजनातून, गाडगेबाबांच्या कीर्तनातून समजले आणि म्हणूनच प्रथम आपला गाव स्वच्छ करण्याचा निर्धार केला व त्यातूनच गावाची स्वच्छता केली. या कृतीची दखल घेऊन गावकऱ्यांनी आपल्याला पूजारी पद दिले, असे त्यांनी सांगितले. आज ते कवडसी व इतर परिसरातील गावात ग्रामस्वच्छता करीत आहेत. विठोबा हे सायलकने प्रवास करीत असून त्यांच्या सायकलच्या मागे नेहमीच खराटा बांधलेला असतो. जिथे घाणीचे साम्राज्य दिसेल, तिथे ते खराट्याने झाडून स्वच्छ करतात. त्याच गावात भजन व कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेवर मार्गदर्शन लोकांना करतात. आपल्या संसाराला तिलांजली देऊन ग्राम स्वच्छतेसाठी त्यांची गावोगावी भटकंती सुरूच असते. कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करता जे मिळेल ते खाऊन ते आपली उपजिवीका चालवित आहेत. असा आधुनिक विठोबा मात्र शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहे. आतातरी शासनाने या विठोबाला कुटुंब चालविण्याइतपत मानधन द्यावे, अशी अपेक्षा आहे.