जोगी दुहेरी हत्याकांड घटनास्थळाला केंद्रीय मंत्र्यांची भेट
By Admin | Updated: September 5, 2015 01:03 IST2015-09-05T01:03:22+5:302015-09-05T01:03:22+5:30
३१ आॅगस्टच्या रात्री नांदा येथे घडलेल्या डॉ. जोगी दाम्पत्य हत्याकांडाला तीन दिवस लोटले असून पोलीस प्रशासनाच्या हाती मात्र कोणतेही धागेदोरे न लागल्याने ...

जोगी दुहेरी हत्याकांड घटनास्थळाला केंद्रीय मंत्र्यांची भेट
मुलीशी चर्चा : तीन दिवस लोटूनही तपास जैसे थे
नांदाफाटा : ३१ आॅगस्टच्या रात्री नांदा येथे घडलेल्या डॉ. जोगी दाम्पत्य हत्याकांडाला तीन दिवस लोटले असून पोलीस प्रशासनाच्या हाती मात्र कोणतेही धागेदोरे न लागल्याने तपास संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. गावात अजूनही भीतिसदृश वातावरण असून गुरूवारी केंद्रीय रसायन व खते मंत्री हंसराज अहीर यांनी घटनास्थळाला भेट दिली व डॉ. जोगी यांच्या मुलीला मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्यात येईल, असे आश्वासन दिले.
ना. हंसराज अहीर यांनी पोलीस अधीक्षकासोबत बैठक निश्चित झाल्याचेही यावेळी सांगितले. घटनेचा तपास वरिष्ठ पातळीवर सुरु असून लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावला जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र स्थानिक गडचांदूर ठाणेदार केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान उपस्थित नव्हते. मंत्र्यांच्या सहकाऱ्याचा भ्रमणध्वनीवर काहीही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईलवरुन ठाणेदारांना कॉल केला असता ठाणेदाराचा फोन सायलेंट मोडवर होता, असे चक्क उत्तर ना. अहीर यांना मिळाले. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा जागृतपणा यातून दिसून येणे.
उपस्थित गावकऱ्यांनी गावात पोलीस गस्त ठेवावी, जोगी परिवाराला सामान्य सुरक्षा प्रदान करावी व नांदाफाटा पोलीस चौकीत मनुष्यबळ वाढवावे अशा अनेक मागण्या यावेळी केल्या.
खुनाचा छडा लवकरात लवकर न लागल्यास संपूर्ण गाव रस्त्यावर उतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही गावकऱ्यांनी यावेळी दिला.
यावेळी मंत्र्यासमवेत संजय मुसळे, पुरुषोत्तम निब्रड, सतीष कोम्मावार, शिवाजी शेलोकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मात्र पोलीस प्रशासनाच्या अल्प उपस्थितीमुळे मंत्र्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली. (वार्ताहर)