पहाडावरील गावांना घागरभर पाणी मिळेना !

By Admin | Updated: May 27, 2016 01:06 IST2016-05-27T01:06:33+5:302016-05-27T01:06:33+5:30

दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असून पाण्याची मागणीही वाढताना दिसत आहे. उन्हाळ्याचे अजूनही काहीदिवस शिल्लक आहेत.

The villages on the hill get plenty of water! | पहाडावरील गावांना घागरभर पाणी मिळेना !

पहाडावरील गावांना घागरभर पाणी मिळेना !

वर्षानुवर्षे पाण्यासाठी भटकंती: दूषित पाण्यावर भागवितात तहान
ंशंकर चव्हाण जिवती
दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असून पाण्याची मागणीही वाढताना दिसत आहे. उन्हाळ्याचे अजूनही काहीदिवस शिल्लक आहेत. सुर्याचा पारा आणखी किती दिवस तिव्र राहणार, याची नागरिकांना चिंता असतानाच पाणी टंचाईनेही तोंडचे पाणी पळविले आहे. पहाडावरील गावांना घागरभर पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. नाईलाजाने दूषित पाणी पिऊन तहान भागवित आहेत. मात्र प्रशासन सर्व आलबेल असल्याचे सांगत हातावर हात ठेवून गप्प आहे.
उल्लेखनीय असे की जिवती तालुक्यातील गावे टंचाईमुक्त करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केल्याची बतावणी करीत असले तरी पाणी टंचाईची झळ मात्र पहाडावर जीवघेणी ठरत आहे. तालुक्यातील घनपठार, जनकापूर, पाटागुडा, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, गढपांढरवणी, खडकी, हिरापूर, पोचगुडा, नगराळा, लेंडीगुडा, जानकपठार, लोलडोह, टाटाकोहाड, भुरी येसापूर, गोंदापूर, भोस्कापूर, संगणापूर, आनंदगुडा, चिलाटीगुडा, चलपतगुडा, गोंडगुडा (मरकागोंदी), घाटराईगुडा, पाळडोह, चिखली, घोडणकप्पी, सेवादासनगर, हिमायतनगर, परमडोली, मुकादमगुडा, देशमुखगुडा, धाबा, राहपल्ली अशा अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. काही आदिवासी गुडे नाल्यात डबके खोदून दूषित पाण्यावर आपली तहान भागवित आहे. गावात असलेल्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंतच पुरले. त्यानंतर टँकरने पाणी पुरवठा केल्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे पहाडावरील बहुतांश टंचाईग्रस्त गावात टँकर पोहचले नाही. त्यामुळे पहाडावरील नागरिकांना घागरभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पाण्याचे महत्त्व एवढे वाढले आहे की लहान -मुलांनाही पाणी आणण्यासाठी भरउन्हात पाठविले जात आहे. अनेक गावात महिलांच्या डोक्यावर पाण्याची घागर घेऊन दोन ते तीन मैल अंतरावर भटकंती करावी लागत आहे.

लग्नकार्यात येतात विघ्न
अनेक तरुणांनी आपल्या जन्माचा साथीदार निवडला आहेत. काही जण तयारीत आहे. मात्र पाणी टंचाईमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लग्नकार्यात येणाऱ्या वऱ्हाड्यांना पाणी पाजायचे कुठून, असा प्रश्न निर्माण होत आहे. काही प्रतिष्ठीत व्यक्ती टँकरने पाणी विकत घेत वऱ्हाड्यांची सोय करताना दिसत आहे. गरीब कुटुंबावर मात्र अनेक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

दूषित पाण्यामुळे होतात आजार
गावात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत. पण नियमित ब्लिचींग पावडर टाकत नाही. पाणी उपसा करीत नाही. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. ब्लिचींग पावडर टाकले तरी ते प्रमाणानुसार टाकले जात नाही. त्यामुळेसुद्धा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जाते.

खड्डे खोदून कोलाम भागवितात तहान

प्रत्येक नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी पिण्यास मिळावे, यासाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयोग राबविले जाते. पिण्याच्या पाण्यासाठी पाण्यासारखा खर्चही केला जातो. तरी पण पहाडावरील खडकी, मच्छीगुडा, चलपतगुडा, अशा अनेक गुड्यांतील नागरिक अजूनही खड्डे खोदून दूषित पाण्यावरच तहान भागवत आहे.

Web Title: The villages on the hill get plenty of water!