वेकोलि विरोधात गावकऱ्यांचा ठिय्या
By Admin | Updated: March 20, 2015 01:07 IST2015-03-20T01:07:18+5:302015-03-20T01:07:18+5:30
कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव) येथे नवीन प्रकल्पासाठी वेकोलिने गेल्या सात-आठ वर्षापूर्वी ८१ टक्के शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती.

वेकोलि विरोधात गावकऱ्यांचा ठिय्या
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव) येथे नवीन प्रकल्पासाठी वेकोलिने गेल्या सात-आठ वर्षापूर्वी ८१ टक्के शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती. मात्र इतक्या वर्षानंतरही उर्वरित १७ टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित न झाल्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत. उर्वरित जमीन त्वरित संपादित करावी यासाठी विरूर ग्रामवासीयांनी गुरूवारी अघोषित आंदोलन केले. सुमारे ३०० नागरिकांनी तब्बल दहा तास ग्रामपंचायतीसमोर धरणे दिले. त्यात महिलांची संख्या अधिक हातेी. मात्र सरपंचासह इतर अधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठ दाखविल्यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
संपादित झालेल्या जमीन मालकाला मोबदला म्हणून वेकोलिकडून विशिष्ट रक्कम व नोकरी देण्यात येणार आहे. वेकोलिच्या कामाला प्रारंभ होताच, गावाचे पुनर्वसन होणार आहे. ८१ टक्के ग्रामस्थ गाव सोडून गेल्यानंतर १७ टक्के ग्रामस्थांना तेथे राहणे शक्य होणार नाही. त्यामुळे दानोदा, विरूर, गाडेगाव व खैरगाव या शिवेतील उर्वरित जमीन वेकोलि संपादित करणार की नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. जमिनी संपादित करून आम्हाला मुक्त करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
येत्या २२ मार्चला विरूर (गाडेगाव) येथील वेकोलिचे भूमिपूजन होणार असून वेकोलिकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यक्रमाला मंत्री व प्रशासकीय अधिकारीसुद्धा उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र भूमिपूजन करण्याअगोदर उर्वरित १७ टक्के जमिनीचा प्रश्न निकाली काढावा या मागणीसाठी निवेदन घेऊन ग्रामस्थ ग्रामपंचायतमध्ये गेले. मात्र निवेदन घेण्याकरिता सरपंच उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थ नाराज झाले. प्रशासनानेही या प्रश्नाला बगल दिली. (शहर प्रतिनिधी)