वेकोलिविरुद्ध ग्रामस्थांचा एल्गार

By Admin | Updated: December 16, 2014 22:50 IST2014-12-16T22:50:16+5:302014-12-16T22:50:16+5:30

येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून वेकोलि प्रशासन केवळ आश्वासन देत आहे. अद्यापही गावांत सुविधी पुरविण्यात आल्या नाही. त्यामुळे आता ग्रामस्थ संतापले

Villagers against Waikolai Elgar | वेकोलिविरुद्ध ग्रामस्थांचा एल्गार

वेकोलिविरुद्ध ग्रामस्थांचा एल्गार

गोवरी : येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून वेकोलि प्रशासन केवळ आश्वासन देत आहे. अद्यापही गावांत सुविधी पुरविण्यात आल्या नाही. त्यामुळे आता ग्रामस्थ संतापले असून आंदोलनाचा इशारा वेकोलि प्रशासनाला दिला आहे.
गावातील समस्यासंदर्भात वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सरपंच सुनील उरकुडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी चर्चा केली. यावेळी मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. मात्र दिलेल्या कालावधीत प्रकल्पग्रस्त गावांच्या मागण्या मंजूर न झाल्यास गोवरीवासी आंदोलन छेडणार आहे.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यात वेस्टर्न कोलफिल्डच्या मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहे. गोवरी, पोवनी, गोयेगाव ही गावे वेकोलीला अगदी लागून असल्याने ती वेकोली डेंजरझोन परिसरात येतात.
वेकोलिच्या प्रदूषणामुळे अनेक दुष्परिणाम या गावांना नेहमीच सहन करावे लागत आहे. मात्र वेकोलिकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. प्रकल्पग्रस्त ‘दत्तकगाव’ योजनेअंतर्गत वेकोलिने गावात सोईसुविधा करणे आवश्यक आहे. परंतु वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. केवळ आश्वासनावरच आजपर्यंत वेळ मारून नेली आहे. २००६-०७ मध्ये पोवनी कोळसा खाणीसाठी नाला वळविला. मात्र त्यावर कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे पुराच्या पाण्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येते. याला वेकोलिचे नियोजनशुन्य धोरण जबाबदार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. गोवरी, पोवनी, साखरी, चिंचोली, गोयेगाव, अंतरगाव येथे वेकोलिचे कामगार मोठ्या प्रमाणात आहे. गावकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या व गावकऱ्यांच्या मुलांना स्कुलबस देण्याची मागणी केली. मात्र वेकोलिने याकडही दुुर्लक्ष केले. कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येत असल्याने अनेक घरांना तडे गेले आहे. नवीन बांधकाम यामुळे प्रभावित होत आहे. वेकोलितर्फे पाणी उपसामुळे परिसरातील पाण्याची पातळी खालावली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील बोरवेल आटत असल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. नव्याने निर्माण केलेलि ‘गोवरीडीप’ कोळसा खाण परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. कोळसा वाहतुकीसाठी कोणताही पक्का डांबरी रस्ता तयार न करता केवळ माती टाकून रस्ता तयार केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेली शेती निकामी होत आहे. मात्र अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही. यासाठी केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थ व वनमंत्री मुनगंटीवार, आमदार धोटे, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ांना निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.(वार्ताहर)

Web Title: Villagers against Waikolai Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.